शरद पवारांनी उलगडली रेशीमभरी सल

पूर्वी मामाच्या गावच्या पोरीबरोबर लग्न करण्याची पद्धत होती. ही इच्छा राहूनच गेली , अशा शब्दात भाचे शरद पवार यांनी मनाच्या अंतरंगी लपलेली रेशीमभरी सल रविवारी समस्त मामांपुढे बोलून दाखवली. निमित्त होते लाडक्या भाच्याच्या मामाचा गाव असलेल्या  गोलिवडे भेटीचे.

माजी केंद्रीय मंत्री शरद  पवार यांच्या मातोश्री शारदाबाई यांचे गोलिवडे हे जन्मगाव. म्हणजेच मामाचे गाव. आज प्रथमच  मामाच्या गावाला पवार यांनी ग्रामस्थ, स्नेही यांच्या आग्रहास्तव  भेट दिली.आपल्या भाच्याचे स्वागत करण्यासाठी अवघा गाव एका मंडपात जमला होता.  ग्रामस्थांनी भाच्याचे स्वागतही दणक्यात आणि रांगडय़ा कोल्हापुरी ठेक्यात केले.

हिरवी साडी नेसलेल्या सुहासिनींनी पवार यांचे औक्षण केले. डोईवर केशरी फेटा आणि पारंपरिक वेशातील तरुणांनी मिरवणूक काढली. पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी भाच्याला मंचावर नेले. शाल , श्रीफळ , फेटा बांधून संविधानाची प्रत आणि ग्रामदैवत भैरवनाथाची चांदीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. पवार यांनीही आनंदाने सत्कार स्वीकारला.

त्यानंतर पवार यांनी ग्रामस्थांना धन्यवाद देऊन पंधरा मिनिटांच्या मनोगतात आपली आई , आईचे संस्कार, कोल्हापूरचे पाणी याविषयीच्या आठवणींचा पट उलगडला. आई विषयीची कृतज्ञता व्यक्त करून पवार म्हणाले,की आईने भावंडांना काळजीपूर्वक  शिकवले. त्यामुळे मी वगळता तिन्ही मुले परदेशात शिकली. आयुष्यात  यशस्वी झाली.  एकाच  कु टुंबातील तीन भावांना राष्ट्रीय पातळीवरचे पद्मश्री आणि  पद्मविभूषण पुरस्कार मिळाले. तीन सुपुत्रांना सर्वोच्च सन्मान मिळाल्याचे  पहायला आई असती तर तिला नक्कीच समाधान वाटले असते. कोल्हापूरची माती, पाणी आणि माणसे यांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असल्याचे पवार यांनी आवर्जून नमूद केले.