कोल्हापूर : शिवसेनेत नव्हे तर शिवसेनेपासून फुटून गेलेल्यांमध्ये चलबिचलता निर्माण झाली आहे, असे मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झाली आहे. याकडे लक्ष वेधले असता पेडणेकर यांनी त्याचा इन्कार केला. शिवसेनेमुळे जे मोठे झाले त्यांच्यामध्ये चलबिचलता निर्माण झाले आहे. ती तशीच सुरू राहील, असेही त्या म्हणाल्या

पेडणेकर यांनी आज करवीर निवासिनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या, महाराष्ट्रात सुरू असलेली अराजाकाचा वध करण्याची शक्ती देवीने द्यावी. लोकशाहीत वाटेल ते चालते असे मुळीच नाही. संविधान, न्यायिक बाजू येथे मनुष्य शक्तीची संपत आहे. अशावेळी देवदेवतांची सर्वोच्च शक्ती असलेल्या अंबामातेने महाराष्ट्र, मुंबई, शिवसेनेला शक्ती देवू दे अशी प्रार्थना केली आहे.

कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही खासदार शिंदे गटाच्या मार्गावर असल्याकडे लक्ष वेधले असता पेडणेकर म्हणाल्या, अविचारांचा पूर येत असतो. तिकडे जाऊन कोणी सुखी होणार असेल असे वाटते त्यांनी जरूर जावे. शिवसेना पुन्हा भक्कम होणार आहे. रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे हे सेना प्रमुख म्हणून न्याय देत नसल्याच्या विधानावर त्या म्हणाल्या, कोणाची तरी भांडणे, कोणाचा तरी राग हा उद्धव ठाकरेंवर काढला जात आहे. कोणी काहीही भूमिका घेतली तरी आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत खंबीर आहोत.