कोल्हापूर शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढते आहे. मात्र महापालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीमधून गुन्हेगारी वृत्ती असलेल्या काही जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यापकी काहींनी कपबशी चिन्हाची मागणी केली होती, पण त्यांना ‘मटका’ चिन्ह मिळायला हवे होते, असा टोला शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत लगावला.
त्या म्हणाल्या, शिवसेनेचे राजकारण लाचारीचे नाही. पण सेनेच्या वाघाला डिवचण्याचा डाव काहींनी केला, त्यांना शिवसेना जशास तसे उत्तर देईल. कोल्हापूर शहरात नागरी सुविधांचे विविध प्रश्न प्रलंबित आहे. शिवसेने जनतेला जी आश्वासने दिलीत ती पूर्ण करेल. शहराला संपूर्ण टोलमुक्त करू, असे आमचे वचन आहे. कोल्हापूरचे सर्व प्रश्न निकालात काढण्यासाठी विधिमंडळात आम्ही पाठपुरावा करू.
महापालिका हद्दवाढ  प्रश्नावर त्या म्हणाल्या, ग्रामीण भागातील आमदार आपल्या स्थानिक लोकांच्या मताचा आदर करून हद्दवाढीस विरोध करत आहेत. मात्र कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबत आम्ही सकारात्मक पाऊल उचलून हा विषय मार्गी लावू.
ताराराणी आघाडीला मटका चिन्ह मिळायला हवे होते. त्यांनी मटक्याचा प्रचार केला असता. पण हा मटकाच जनता फोडून टाकतील, असा टोला गोऱ्हे यांनी लगावला. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार आदी उपस्थित होते.