प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या नंदवाळ (ता. करवीर) येथे भारत राखीव बटालियनच्या मैदानावर गोल रिंगण सोहळा आयोजित करण्यावरून ग्रामस्थ व पोलीस यांच्यात सोमवारी धक्काबुक्की झाली. ग्रामस्थांना हटवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करणे भाग पडले. पोलिसांचे सुरक्षाकडे भेदून ग्रामस्थांनी पालखी सोहळा केला. नंदवाळ येथे आषाढी एकादशीला भव्य स्वरूपात सोहळा पार पडतो. कोल्हापुरातून दिंडी नंदवाळपर्यंत निघताना भव्य रिंगण सोहळा होतो. गावात गेला आठवडाभर हरिनाम सप्ताह सुरू आहे. या अंतर्गत गावातील भारत राखीव बटालियनच्या आरक्षित मैदानावर रिंगण सोहळा दिंडीचे आयोजन केले होते. त्यासाठी गेले काही दिवस जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन बटालियन अधिकारी यांच्याशी ग्रामस्थ चर्चा करत होते. या जागेवर सोहळा करण्यावर ग्रामस्थांचे एकमत होते. तर कायदा-सुव्यवस्था त्याला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी आज आरक्षित मैदानावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. आज सकाळी गावात उभे रिंगण व दिंडी हा धार्मिक सोहळा झाला. मैदानावर सोहळा आयोजित करण्यात विरोध करणाऱ्या शासनाचा शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके, यात्रा समितीचे अध्यक्ष जोतिराम पाटील, सरपंच अस्मिता कांबळे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी निषेध नोंदवून नोंदवला. गावकऱ्यांनी मैदाना शेजारीच ठिय्या आंदोलन केले. मैदानात जाण्यास विरोध केल्याने पोलिसांनी ग्रामस्थांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याने गोंधळ सुरू झाला. ग्रामस्थांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर जमाव काहीसा पांगला. तर काही ग्रामस्थांनी पोलिसांचे सुरक्षाकडे भेदून मैदानावर पालखी सोहळा आयोजित केला.