दयानंद लिपारे, लोकसत्ता 

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८ हजारावर मताधिक्क्याने विजय मिळवत भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा पराभव करून पक्षाचा हात आणखी मजबूत केला. हा विजय महाविकास आघाडीच्या ऐक्याला बळ देणारा ठरला. अपेक्षित मताधिक्य नसल्याने त्याचा विचार करावा लागेल. हिंदू मतांचे ध्रुवीकरणाचा हुकमी एक्का हाती असतानाही खुद्द भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यातील पराभव पक्षाला चिंता करायला लावणारा आहे.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्यानंतर झालेल्या या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यामागे भावनिक जोड होती. भाजपने बेरजेचे राजकारण करीत सुरुवातीपासून मुत्सद्दीपणाने पावले टाकली होती. २०१४ मध्ये या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणूक लढवलेले सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली. कदम यांचे जिल्ह्यात राजकीय वजन असणारा नातेवाईकांचा महाडिक परिवार, भाजपला विधानसभेला मिळालेली ४० हजार मते आणि हिंदूत्वाला साद घालणारा शिवसैनिकांची मदत अशी गोळाबेरीज होऊन भाजपचा विजय शक्य आहे, असे आडाखे भाजपकडून मांडण्यात आले होते. भाजप केवळ त्यावर थांबला नाही. राज्यभरातील भाजपचे प्रमुख नेते, कार्यकर्त्यांची फौज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील अनेक कार्यकर्ते घरोघरी प्रचार करीत असल्याने वातावरण भाजपला अनुकूल बनत गेले. याचा दाखला मतदानाच्या आकडेवारीतून दिसून येतो. भाजप या निवडणुकीत दुप्पट म्हणजे ८० हजारांच्या घरात पोहोचला आहे. पराभव झाला तरी एकार्थाने भाजपच्या दृष्टीने ही जमेची बाजू ठरली.

हिंदूत्वाभोवतालचे राजकारण

या मतदारसंघात शिवसेनेने पाच वेळा विजय प्राप्त केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपने या निवडणुकीत सुरुवातीपासून सैनिकांना भावणारा हिंदूत्वाचा मुद्दा प्रकर्षांने मांडला. काश्मीर फाईल, पावनिखड यासारखे चित्रपट प्रचाराचा मुख्य भाग बनवून टाकले. कठोर भाषेत अल्पसंख्याकांना लक्ष्य केले गेले. अखेरच्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘ कोल्हापुरातील शिवसैनिकांमध्ये हिंदूत्वाचे अस्मिता ठासून भरली असल्याने ते हिंदूत्वाचा धागा म्हणून भाजपलाच मतदान करतील’, अशी गुगली टाकली होती. त्यांच्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे हिंदूत्ववादी मतदारांमध्ये चलबिचलता दिसून आली. भाजपच्या आक्रमक हिंदूत्वाच्या प्रचाराचा आघाडीने धसका घेतला होता. त्यातूनच प्रचाराला काही तास उरले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आभासी सभा घेणे भाग पाडले. मुख्यमंत्र्यांनी ठाकरी शैलीत भाजपच्या हिंदूत्वाचे वाभाडे काढले. ‘ आम्ही भाजपला सोडले आहे; हिंदूत्व नाही,’ असे म्हणत शिवसेनेचे हिंदूत्व अधिक कडवट कसे आहे याचे अनेक दाखले दिले. ‘ माझा कडवट शिवसैनिक भाजपच्या बेगडी हिंदूत्वाला भुलणार नाही. सत्तेत एकत्र आलेल्या महाविकास आघाडी भाग म्हणून जयश्री जाधव यांच्या पाठीशी तो ठामपणे उभा राहील,’ अशी भावनिक साद घातली. परिणामी भाजपकडे सरकू लागलेल्या शिवसेना मतदारांच्या केंद्रिबदूला बांध घालण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने केले. या मतदारसंघात उमेदवारीसाठी दावा करणारे शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी ठाकरे यांच्या आदेशामुळे आघाडीच्या प्रचारात प्रामाणिकपणे राहिले. त्यामुळे भाजपला अपेक्षित शिवसेनेची मते वळली नाहीत. शिवसेनेच्या आणि एकूणच आघाडीच्या ऐक्यामुळे काँग्रेसचा विजय शक्य झाला.

महाविकास आघाडीचे प्राबल्य

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून भाजपने सातत्याने टीकेचे प्रहार चालवले आहेत. पंढरपूरची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ‘मविआ’ने जनमत गमावले असल्याचा दावा भाजपकडून ठासून केला जात होता. देगलूरमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव करून आघाडीचे स्थान भक्कम असल्याचे दाखवून दिले. १-१ असा बरोबरीत असलेला सामना कोल्हापुरात नेमके कोणते वळण घेणार यावर राज्याच्या राजकारणाचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहे याची चाचणी असल्याने निवडणुकीला अधिक महत्त्व प्राप्त होवून तिने राज्याचे लक्ष वेधून घेतले. अशा या संघर्षांत मविआने विजय मिळवत भाजपवर कुरघोडी केली. आघाडीच्या सत्ताकारणात कितीही कुरबुरी असल्या तरी भाजपला रोखण्यासाठी तिन्ही पक्षांची ऐक्य फायदेशीर ठरू शकते याचा प्रत्यय या निकालाने दिला आहे. अस्वस्थ कार्यकर्त्यांत उमेद पेरण्यास हा विजय पुरेसा असल्याचे स्पष्ट होत आहे. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, हसन मुश्रीफ, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उदय सामंत, विनायक राऊत, अमोल कोल्हे, संजय मंडलिक, राजेंद्र पाटील यड्रावकर आदी तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी कुरबुरी विसरून एकदिलाने प्रचाराची मोहीम उघडल्याने आघाडीच्या विजयाचे द्वारही उघडले गेले. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आक्रमक रणनीतीला सरस ठरणारी रणनीती आखून सतेज पाटील हे शह देण्यात यशस्वी ठरले.