कोल्हापूर : पंचगंगा नदीतील तेरवाड बंधाऱ्यापाठोपाठ आता शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे. कारखान्यातून सोडण्यात आलेल्या रसायन मिश्रित काळय़ा पाण्यामुळे ही घटना घडली असल्याचे सोमवारी सांगण्यात आले. पंचगंगा नदीच्या प्रदूषणात वाढ झाल्याने नदीपत्रात मृत माशांचा खच साचत असल्याचे विदारक दृश्य सतत दिसत आहे. वळिवडे - गांधीनगर, रुई बंधारा , टेरवड बंधारा येथे हा प्रकार उघडकीस आला. तर आता शिरोळ बंधाऱ्याजवळ मृत माशांचा खच पडला आहे.औद्योगिक वसाहतीतून रसायन मिश्रित पाण्यावर प्रक्रिया करण्याऐवजी थेट काळे पाणी नदीत सोडत असल्यामुळे नदीचे मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होत आहे. नदीतील पाणी फेसाळलेले दिसत आहे. मासे मृत होऊन नदीकाठी तरंगत आहेत. हे मृत मासे नदीतून बाहेर काढण्याचे काम चालू आहे. उपद्रव वाढलादूषित पाण्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. शेतीलाही फटका बसत आहे. माशांची पैदासच नष्ट होत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने रसायनयुक्त प्रदूषित पाण्याचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी नदीकाठावरील ग्रामस्थांतून होत आहे.