कोल्हापूर : कापसाचे दर वाढल्याने व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कापूस घेऊन साठेबाजी केली आहे. आता ते जास्त दरात विकत आहेत. जाणीवपूर्वक टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर राज्य व केंद्र सरकारने धाडी टाकून उपलब्ध कापूस, साठवणुकीचा कापूस रास्त भावात खुल्या बाजारात उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राज्य वस्त्रोद्योग सहासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सोमवारी केली आहे. गत वर्षी भारतात कापसाचे उत्पादन कमी झाल्याने कापसाचे दर भरमसाट वाढले. याचा फायदा कापूस व्यापाऱ्यांनी घेतला. यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असताना त्याकडे दुर्लक्ष झाले. याचा फटका सूतगिरण्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. सध्या कापसाचा दर १ लाख १० हजार प्रति खंडी असा आहे. या दराने जरी कापूस घ्यायचा म्हटले तरी व्यापारी कापसाची उपलब्धता अल्प आहे असे सांगून सूतगिरण्यांना नागवत आहेत. ..तर सूतगिरण्या बंद कापूस दरातील सततची वाढ ही राज्यातील सूतगिरण्या, यंत्रमाग उद्योगासाठी धोक्याची घंटा ठरू लागली आहे. ही दरवाढ अशीच आणखी काही दिवस राहिली तर गिरण्या व यंत्रमाग कोणत्याही क्षणी बंद पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सहकारी व खासगी सूतगिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी अनेक सूतगिरण्यांच्या चालकांनी केली आहे. यासंदर्भात वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पीयुष गोयल यांना भेटून अंतिम निर्णय घेणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.