दयानंद लिपारे कोल्हापूर : यंदा मान्सूनमध्ये ९८ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडण्याची आनंद वार्ता असताना कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराच्या पट्टा असलेल्या भागात आतापासूनच धास्ती निर्माण झाली आहे. यापूर्वीच्या चार महापुरांच्या संकटातून हा परिसर सावरला नसताना संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यापूर्वी शासन, प्रशासनाने शास्त्रोक्त उपाययोजना कराव्यात याकरिता आंदोलनाच्या लाटा उसळू लागल्या आहेत. वडनेरे समितीच्या उपाययोजना अद्याप मार्गी लागल्या नसल्याने महापूर पूरग्रस्तांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दशकांमध्ये चार वेळा महापुराचा जबर दणका बसला आहे. सन २०१५. २०१६, २०१९ आणि २०२१ या चार महापुराने या भागात जीवित, आर्थिक हानी झाली आहे. स्कायमेट या हवामान एजन्सीने यंदा९८ टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. मान्सूनची सुरुवात दमदार होणार असून जून महिन्यात जास्त पाऊस अपेक्षित आहे, असा अंदाज व्यक्त केला आहे. पाऊसमान उत्तम होणार असल्याने त्याचा पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्यासाठी पुढील काळासाठी उपयोग होणार आहे. आंदोलनाची मोर्चेबांधणी अलीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये कमी काळात अधिक पाऊस पडण्याचा प्रमाण वाढले आहे. गतवर्षी तीन दिवसांत ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने पंचगंगा व कृष्णा नदीच्या पुराच्या पातळीने विक्रमी उंची गाठल्याचे निदर्शनास आले होते. यंदाही पुन्हा महापुराचा दणका बसतो की काय याची धास्ती पूरग्रस्त भागात व्यक्त केली जात आहे. यातूनच कोल्हापूर शहराच्या पश्चिमेकडील करवीर तालुक्यातील १२३ गावांनी तसेच महापुराचा सर्वाधिक फटका बसणाऱ्या शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त समितीने सांगली जिल्ह्यातील महापूर संघर्ष समितीच्या सहकार्याने पूर परिषद आयोजित करीत आवाज उठवला आहे. उपाययोजना बासनात १३० पूरग्रस्त गावच्या ग्रामपंचायतीने महापूर रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना २४ सप्टेंबर रोजी पूरस्थितीचा शास्त्रीय अहवाल करावा यादी सुचवलेल्या उपाययोजनांची कार्यवाही त्वरित सुरू करावी, पुराला अडथळा ठरणारे अडथळे दुर करण्यात यावे आदी मागण्या केल्या होत्या. उपाययोजनांची अंमलबजावणी झाली नाही ही तर आंदोलन पुढच्या पातळीवर नेण्याचा निर्धार गेल्या आठवडय़ात धरणे आंदोलनावेळी करण्यात आला. महापुरास मानवनिर्मित चुका कारणीभूत ठरत आहे. त्या दुर करण्याची मागणी आंदोलक या नात्याने बाजीराव खाडे यांनी केली. काँग्रेसच्या पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस असलेले खाडे यांच्यासह या सर्व गावातील ग्रामस्थ राजकीय विचारधारा बाजूला ठेवून पूरग्रस्तांच्या हितासाठी कार्यरत झाले आहेत. याचवेळी शिरोळ तालुक्यातील ४३ गावांत पूर नियंत्रित ठेवण्यासाठी आवाज उठला आहे. पूर परिषदेमध्ये वडनेरे समितीने सूचित केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी झालेली नाही, अलमट्टी धरणाबाबत ठोस निर्णय होत नाही, अकारण पुलांची निर्मिती करून पूर वाढवण्यास सहाय्यभूत घटक वाढत आहेत याकडे परिषदेत लक्ष वेधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. जिल्ह्याच्या दक्षिण भागात असलेल्या चंदगड तालुक्याला ही ताम्रपर्णी नदीच्या माध्यमातून पुराचा धोका पोहोचत असतो. तेथील पूरग्रस्तांनीही महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी लावून धरली आहे. प्रशासनाची चाचपणी संभाव्य पूर स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. मान्सून पूर्वतयारीसाठी पश्चिम विभागातील भारतीय तटरक्षक दल आगामी मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज आहे. शोध आणि बचाव कार्याची पोहोच वाढवण्यासाठी, पश्चिम किनाऱ्यावरील विविध हवाई क्षेत्रांशी समन्वय साधणे, जिल्ह्यातील सुविधांचे समन्वय आणि मूल्यांकन करण्यासाठी कोल्हापूरला विमानतळास भेट दिली. तर आपत्ती निवारण पथकाने पूर निवारणासाठी सज्ज असल्याचे म्हटले आहे. राज्यकर्त्यांना आव्हान सांगली येथे मे महिन्याच्या मध्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई येणार आहेत. त्यांच्याशी पूरग्रस्तांच्या उपाययोजनांबाबत चर्चेची वेळ पूर परिषदेच्या प्रतिनिधींनी मागितली आहे. ती नाकारली गेल्यास पूरग्रस्तांच्या मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळीने नेण्याचा इशारा दिला आहे. एकूणच पूरग्रस्तांच्या भावना तीव्र होत असताना संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या सांगली आणि शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यात तात्काळ कोणत्या उपाययोजना होणार याबाबत चर्चा होत आहे.