राज्यातील पहिला कारखाना कोल्हापूर : राज्यातील साखर संघासह साखर कारखान्यांनी उसाच्या एफआरपी टप्प्याटप्याने देण्याची भूमिका घेतली असताना त्याला शह देत कागल येथील श्री छत्रपती शाहू सहकारी सहकारी साखर कारखान्याने आगामी हंगामासाठी एफआरपी देण्याचा निर्णय सोमवारी घेतला आहे. त्यासाठी प्रतिटन २९९३ रुपये इतकी रक्कम एकरकमी देणार आहे,अशी घोषणा अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी केली. असा निर्णय जाहीर करणारा शाहू हा राज्यातील पहिला कारखाना ठरला आहे. कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व.राजे विक्रमसिंह घाटगे यांची उच्चांकी ऊस दर देण्याच्या परंपरेत समरजितसिंह घाटगे यांनीही सातत्य राखले असल्यामुळे कारखान्याच्या सभासद शेतकरी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे. घाटगे म्हणाले,की महापुरामुळे उसासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य शासनाने प्रामाणिक शेतकऱ्यांना दीड वर्षांपूर्वी जाहीर केलेले ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान अद्याप जमा केलेले नाही. शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झालेली असल्याने शाहू साखर कारखान्याने तुकडे न करता एकरकमी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, वित्त व्यवस्थापक आर. एस. पाटील उपस्थित होते.