कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत कागल तालुक्यामध्ये कोणी प्रचार केला हे गावागावात असलेल्या मंडलिक गटाच्या कार्यकर्त्यांना पूर्णपणे माहीत आहे. या प्रचाराच्या या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वाद आता थांबवण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी येथे व्यक्त केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक पराभूत झाल्यानंतर कागल तालुक्यात हसन मुश्रीफ – समरजितसिंह घाटगे गटात समाज माध्यमात युद्ध रंगले आहे.
या वादाकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले , निवडणुकीच्या निकालावरून आरोप प्रत्यारोप होण्याची मुळीच आवश्यकता नाही. तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये मंडलिक गटाची कार्यकर्ते आहेत. कोणी प्रचार केला याचे त्यांना पूर्ण कल्पना आहे. खरे तर श्रीमंत शाहू महाराज यांना तीन लाखाचे मताधिक्य मिळेल असे वाटत होते. दलित, अल्पसंख्यांक यांचा पाठिंबा मिळाल्याने मिळून ही ते दीड लाखावर राहिले. याचा अर्थ तालुक्यात सर्वांनीच कमी अधिक असेना काम केलेले आहे. त्यावर चर्चा करण्याची गरज नाही.
हेही वाचा : कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; ओढ्यांना पूर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात तील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. मात्र त्यात कसलेही तथ्य नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन मालक रोहित पवार यांनी दिलेल्या निमंत्रणाला अजितदादा गटातील कोणत्याही आमदाराचे प्रतिसाद मिळणार नाही, असे मत हसन मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केले.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्षाचे कोणी आमदार येणार असतील तर त्यांनी पंधरा दिवसात प्रवेश करावा असे विधान केले आहे. यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४३ आमदारांची बैठक पार पडली. पाच आमदार वैयक्तिक कारणामुळे येऊ शकले नाहीत. यावेळी सर्वच आमदारांनी विधानसभा निवडणुकीत पराभव झाला तरी अजितदादांचे नेतृत्व सोडणार नाही अशी शपथ घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नवीन मालक रोहित पवार यांनी दिलेल्या निमंत्रणाला आमच्या गटातील कोणताही आमदार प्रतिसाद देणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले.
हेही वाचा : कोल्हापुरात भाजप नेत्यांच्या पत्नीस २० लाखाचा गंडा
शक्तीपीठ प्रस्तावास विरोध
प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाचा लोकसभा निवडणुकीत राजकीय फटका बसला आहे. त्यामुळे तो रद्द व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे मंगळवारी करणार असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत यासाठी आम्ही प्रचार केला होता. त्यास देशभरात भरघोस प्रतिसाद मिळालेला आहे.उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. त्यास आमच्या शुभेच्छा आहेत, असेही यावेळी हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांना सांगितले.
© The Indian Express (P) Ltd