फेरीवाल्यांना आहे त्या ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्या, अन्यथा त्यांना नोकऱ्या द्या. फेरीवाल्यांवर चालू असलेली अन्यायकारक कारवाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिला. फेरीवाल्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महापालिकेवर धडक मोर्चा काढला.
‘न्याय द्या, न्याय द्या फेरीवाल्यांना न्याय द्या‘, ‘महापालिका प्रशासनाचा धिक्कार असो..‘ अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून सोडला. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती. यानंतर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
या वेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांनी फेरीवाल्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या मानाने त्यांना योग्य त्या सोईसुविधा पुरवणे गरजेचे आहे. परंतु अतिक्रमणाच्या नावाखाली त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करणे आवश्यक असताना कायद्याचा बडगा उगारत फेरीवाल्यांवर अन्याय केला आहे. जागा देताना व्यापाऱ्यांच्या दुकान गाळ्यांसमोर जागा दिल्या आहेत. यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. यामुळे ही कारवाई त्वरित थांबवावी त्यांना आहे त्या ठिकाणी व्यवसाय करण्यास द्यावेत, अशी मागणी केली.