दयानंद लिपारे

कोल्हापूर : इचलकरंजी महापालिका कार्यक्षेत्रासाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून नळपाणी योजना राबवण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद केल्यानंतर योजना राबवण्याच्या प्राथमिक हालचाली सुरू झाल्या. याचवेळी नदीकाठच्या लोकांनी पाण्याचा एक थेंबही देणार नाही असे म्हणत योजनेच्या विरोधात पुन्हा एल्गार सुरू केला आहे. या प्रश्नी इचलकरंजीतील लोकप्रतिनिधींची भूमिका कमालीची थंड असताना तरुणाई योजना राबवली प्रयत्नशील राहिली आहे. योजनेचे काम पुढे नेण्याचे आव्हान कोण पेलणार हा प्रश्न आहे.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
ichalkaranji hinger strick
सुळकुड बंधाऱ्यावरील महिलांचे उपोषण मागे; दूधगंगा पाणी प्रश्नी मंत्रालयात बैठकीचे आयोजन
What did Pune get in the state budget for the year 2024-25
अर्थसंकल्पात पुण्याच्या वाट्याला काय?… वाचा सविस्तर

इचलकरंजी शहरासाठीची चौथी नळ पाणी योजना राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यापूर्वीच्या नळ पाणी योजना अपुऱ्या पडल्याने नव्या पर्यायचा शोध घेणे क्रमप्राप्त ठरले आहे. पंचगंगा, कृष्णा, वारणा नदी व काळम्मावाडी धरण अशी वाटचाल केल्यानंतर कागल तालुक्यातील सुळकुड गावातील दूधगंगा नदीतून १६० कोटी रुपये खर्चाची योजना राबवण्याचे ठरले आहे. योजनेसाठी महापालिकेचे पहिले आयुक्त तथा प्रशासन सुधाकर देशमुख यांनी पाठपुरावा केला. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारणी सदस्य मदन कारंडे यांचेही प्रयत्न कारणीभूत ठरले. योजनेसाठी निधीला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू करणे ही खरी कसोटी ठरणार आहे.

दूधगंगा नदीकाठच्या लोकांनी योजना मंजूर झाली तेव्हाच विरोध केला होता. तर आता निधी मंजूर झाल्यावरही त्यांनी पुन्हा विरोधाचे अस्त्र बाहेर काढले आहे. कागल व शिरोळ तालुका आणि उत्तर कर्नाटकातील काही गावे ही दूधगंगा बचाव कृती समितीच्या माध्यमातून एकवटली आहेत. तेथील सर्वपक्षीय नेतृत्वाने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून इचलकरंजी नळ पाणी योजनेला प्रखरपणे विरोध दर्शवला. ही योजना रद्द करावी, त्याचा फेरविचार केला जावा, योजना राबवण्याचा प्रयत्न झाल्यास कोणालाही फिरू देणार नाही. तिची मोडतोड केली जाईल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. इचलकरंजीला पाणी दिल्याने ग्रामीण भागातील शेतीच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होतील अशी भीतीही त्यांना वाटत आहे. इचलकरंजीच्या पंचगंगा व कृष्णा योजना सक्षम कराव्यात, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

इचलकरंजीकर आग्रही

कागलकरांचा विरोधात असताना इचलकरंजीच्या दूधगंगा योजनेसाठी आपलाच पाठपुरावा कारणीभूत ठरला, अशी भूमिका घेणारे आता मात्र लोकप्रतिनिधी कोणतीच भूमिका स्पष्ट करता नसल्याने इचलकरंजीकरांना सखेद आश्चर्य वाटल्यापासून राहिलेले नाही. लोकप्रतिनिधी, नेते यांची ही भूमिका लक्षात घेऊन ‘ पाण्यासाठी मी इचलकरंजीकर ‘ हे घोषवाक्य योजना राबवण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी तरुणांची एक बैठक पार पडली. त्यामध्ये  योजनेला विरोध करू नये, विरोधाचे मुद्दे खोडून काढण्यात येतील, त्यासाठी गैरसमज दूर करणारे माहितीपत्रक तयार केले जाईल असा निर्णय घेण्यात आला.

एकमेकांकडे बोट

मोठे प्रकल्प राबवताना एकमेकांची भूमिका समजून प्रतिसाद देणे अपेक्षित असते. त्याचा अभाव येथे दिसत आहे. दुधगंगा काठच्या लोकांनी इचलकरंजीकरांनी शेजारच्या पंचगंगा दूषित नदी स्वच्छ करून घ्यावी, असा सल्ला दिला आहे. तर इचलकरंजीकरांनी पंचगंगेचे प्रदूषण कोल्हापूर महापालिकेमुळे अधिक झाले, असे म्हणायला सुरुवात केली आहे. इचलकरंजीच्या खाली राहणाऱ्या गावांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या प्रदूषणामुळे आम्हाला दूषित पाणी प्यावे लागते, असा सूर लावला आहे. एकमेकांकडे बोट दाखवल्यामुळे संवाद घडण्याऐवजी विसंवाद निर्माण झाला आहे.

संयमी भूमिका अपेक्षित

इचलकरंजीकरांना पाण्याची गरज आहे त्यासाठी दूधगंगा काठच्या लोकांनी आपली भूमिका विधायक मार्गाने पटवून दिली पाहिजे. मात्र काही अति उत्साही इचलकरंजीला पाणी आणणारच, प्रसंगी संघर्ष करू, असे समाज माध्यमातून मांडायला सुरुवात केली आहे. अशीच चिथावणीखोर भूमिका वारणा नळ योजनेच्या वेळी अडचणीची ठरली होती. इतिहासातून काही बोध न घेता पुन्हा तीच आक्रमकता ठेवली तर मार्ग सुकर असणार नाही याचे भान उरलेले दिसत नाही. इचलकरंजीसाठी पाण्याचा आग्रह धरणाऱ्यांनी अशा अनाठायी आक्रमकांना आवर घालण्याचीही गरज आहे.

दूधगंगा योजनेला अद्याप तांत्रिक मंजुरी मिळायची आहे. पंचगंगा जवळ असताना दूधगंगेतून योजना राबवण्यामागील कारणमीमांसा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण स्पष्ट करील. प्रत्येक प्रकल्प राबवताना त्यातील पाण्याचा हिशोब करण्यात आला आहे. अतिरिक्त पाणी नळ पाणी योजनांना दिले जाते. दूधगंगा काठावरील लोकांच्या हक्काचे पाणी कमी होणार नाही.

– राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर