कोल्हापूर : पहेलगामवरील हल्ल्याचे प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचे बुधवारी कोल्हापूर, इचलकरंजी येथे जल्लोषी स्वागत करण्यात आले. भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. फटाक्याची आतषबाजी करण्यात येऊन साखर, पेढे वाटण्यात आले.

भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईविषयी सकल हिंदू समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे पेढे आणि साखर वाटून अभिनंदन करण्यात आले. शेवटचा आतंकवादी संपत नाही तोपर्यंत पाकिस्तानवर आक्रमण करणे चालूच ठेवावे, पाकव्याप्त काश्मीर भारताने कह्यात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, गजानन तोडकर, अभिजित पाटील, रामभाऊ मेथे, सौरभ निकम, शिंदे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, उदय भोसले, अनिल दिंडे, डॉ. अश्विनी माळकर, सुनील सामंत आदी उपस्थित होते.

इचलकरंजीत भाजपकडून स्वागत

इचलकरंजीत महात्मा गांधी पुतळा येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानवरील हल्ल्याचे स्वागत केले. माजी मंत्री प्रकाश आवाडे, प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, शेखर शहा, अश्विनी कुबडगे, नजमा शेख कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्या प्रतिमा, तिरंगा राष्ट्रध्वज उंचावत वंदे मातरम्च्या घोषणा दिल्या.