करवीरनगरीच्या राजकारणाचा पाण्याचा रंग या वेळच्या महापालिका निवडणुकीत बदलणार असा ठाम अंदाज व्यक्त केला जात असताना कोल्हापूरची जनता मात्र दोन्ही काँग्रेसच्या बाजूंनी पूर्वीप्रमाणेच चिकटून असल्याचे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. उभय काँग्रेसच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहता महापालिकेत आघाडीची सत्ता येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेत ऐनवेळी बदल झाला, तर हा पक्ष भाजप-ताराराणी आघाडी समवेत जाण्याचे नवे समीकरणही आकाराला येऊ शकते. सद्य:स्थितीत महापौरपदाची खुर्ची काँग्रेस पक्षाकडे जाण्याची अधिकतम शक्यता असली, तरी प्रत्यक्ष महापौर निवडीपर्यंत कोणत्या घडामोडी घडतात हे अधिक लक्षवेधी ठरणार आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या आठव्या सभागृहासाठी रविवारी मतदान झाले. राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजप-शिवसेना या नेत्यांनी करवीरनगरीत परस्परांविरोधात जोरदार शड्ड ठोकल्याने ८१ प्रभागातील निकालाकडे राज्याचेही लक्ष वेधले होते. सोमवारी मतमोजणी सुरू झाली तेव्हा प्रारंभी भाजप-ताराराणी आघाडी यांच्याकडे मतदार झुकले असल्याचे दिसले. पण उत्तरार्धात मात्र दोन्ही काँग्रेसला मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्टपणे जाणवले.
निकालापूर्वी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकाकी लढणारी काँग्रेस तिसऱ्या-चौथ्या स्थानापर्यंत फेकली जाईल असा प्रचार केला जात होता. काँग्रेसला मानणाऱ्या आमदार महादेवराव महाडीक व माजी आमदार मालोजीराजे यांच्या समर्थकांनी ताराराणी आघाडीतून लढण्याचा निर्धार केल्याने काँग्रेसची बाजू कमकुवत झाल्याचे दर्शनी दिसत होते. तुलनेत भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार त्यांच्या प्रभागातील सुभेदार असल्याने ते निश्चितपणे विजयी होतील, अशी खात्री व्यक्त केली जात होती. प्रत्यक्षात भाजप-ताराराणी आघाडीला अपेक्षेइतकी मजल मारता आली नाही. याचे नेतृत्व करणारे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदानादिवशी पन्नास जागा जिंकू, अशी गर्जना केली होती. प्रत्यक्षात त्यांना ३२ जागांवर समाधान मानावे लागले. तर शिवसेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा पालकमंत्र्यांचा हेतूही तडीस गेला नाही. चंद्रकांतदादांनी हवेत राहू नये, असा सल्ला मतदानानंतर देणारे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर हेच हवेत राहिल्याचे निकालाने दाखवून दिले. अवघ्या चार जागांवर सेनेची बोळवण झाली आहे.
काँग्रेस कमकुवत बनल्याने आणि करवीरची जनता भाजप-सेनेला स्वीकारणार नाही असे समीकरण मांडत राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका निवडणुकीसाठी नेटके नियोजन केले होते. त्यांचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांच्यासह अनेकांना िरगणातून बाहेर पडावे लागले. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचा मुश्रीफांचा दावा फोल ठरला असला, तरी त्यांना पंधरा जागांवर समाधान मानावे लागले आहे. असे असले तरी महापौरपदी कोणाला बसवायचे, याचे सुकाणू राष्ट्रवादीच्या हाती आहे. नसíगक मित्र असलेल्या काँग्रेससोबत राहून गत सभागृहाप्रमाणेच दोन्ही काँग्रेस एकत्रित नांदण्याची अधिक शक्यता आहे. पण, भाजप-ताराराणी आघाडीने राष्ट्रवादीला तुमचा महापौर केल्यास पािठबा देऊ अशी भूमिका घेतल्यास सारेच चित्र बदलू शकते.