कोल्हापूर : सध्याच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धजन्य परिस्थितीत भारताला विजय मिळावा, भारतीय सैन्य, नागरिक सुरक्षित राहावेत यासाठी श्री करवीरनिवासिनी अंबाबाई (महालक्ष्मी) हक्कदार श्रीपूजक मंडळ, देवस्थान व्यवस्थापन समिती आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने शनिवारी श्री जगदंबेचे पूजन, श्लोकपठाण करीत विधिवत संकल्प करण्यात आला.
तसेच मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी देवीला साकडे घालण्यात आले. देवस्थान समितीकडील माजी सैनिक असलेले सुरक्षारक्षक महादेव शिंदे आणि सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांना सर्व सैनिकांसाठी प्रतीकात्मक प्रसाद देण्यात आला.
भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या.ॲड. केदार मुनिश्वर यांनी उपक्रमाचा हेतू विशद केला. सचिन ठाणेकर, संजीव मुनिश्वर, माधव मुनिश्वर, अजित ठाणेकर, मंदार मुनिश्वर, अनिल गोटखिंडीकर, सचिन गोटखिंडीकर आदी उपस्थित होते.
बंदोबस्तात वाढ
दरम्यान भारत – पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात सुरक्षेची अधिक खबरदारी घेण्यात येत आहे. देवस्थान समिती, पोलीस यंत्रणा यांच्याकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसरात अतिशीघ्र प्रतिसाद दलाची नजर आहे.
भाविकांचे आकर्षण असलेल्या करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर व परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरात भाविकांची गर्दी कायम असते. प्रत्येक भाविकाकडे असणाऱ्या पिशवीची तपासणी यंत्राद्वारे देवस्थान समितीचे सुरक्षारक्षक करीत आहेत. एक पुरुष व महिला कर्मचारी तपासणीचे काम करीत आहेत.
मंदिराच्या चारही दरवाजांवर एका शस्त्रधारी पोलिसांसह तीन पोलीस २४ तास नजर ठेवून आहेत. भाविकांना वेळोवेळी सूचना केल्या जात आहेत. अगदी मोबाइल खिशातून काढला तरी त्याबाबत समज दिली जात आहे. भाविकांची गर्दी असली तरी त्यांच्या दर्शनामध्ये त्रास होणार नाही याचीही खबरदारी घेतली जात आहे.