कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचे अनेक सोहळे होत असतात. त्यातील वैशाख महिन्यातील हिंदोळा सोहळा हा असाच एक. भाविकांना ओढ लावणारा आणि नेत्रदीपक. याची प्रतीची मंदिरामध्ये काल रात्री आली.

अक्षय तृतीयेला महालक्ष्मी फुलांनी सजवलेल्या झोपाळा आसनस्थ केली जाते. सोहळ्याची सकाळपासून तयारी सुरू होते. दुपारनंतर गरुड मंडपातील सदरेवर झुला बांधून त्यावर फुलांची सजावट करण्यास सुरुवात केली जाते. सायंकाळी सोहळ्याला सुरुवात होते. रात्री आरती झाल्यानंतर झोपाळ्यावरील देवीची झोपाळावरील पूजा पाहण्यासाठी उशिरापर्यंत भाविकांची गर्दी असते.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, श्रीपूजक, भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगत जातो. अक्षय तृतीयेच्या डोलत्सवासाठी कैरी, डाळ, पन्हं असा प्रसाद भाविकांना वाटप करण्यात आला.

अक्षय तृतीया म्हणजे आख्खी अखंड तिथी जी कधी सरत नाही ती. मनुष्याला हे कायम सगळ्या चांगल्या गोष्टी अखंड हव्या असतात. म्हणूनच या तीजेला महत्व आहे. खरतर ही तृतीया जशी देवांची तशीच पितरांची त्याहून अधिक सर्वांच्या तृप्तीची. वैशाख वणव्यात पोळणाऱ्या प्रत्येकाला शांत करण्यासाठी. म्हणूनच आजच्या दिवशी महत्व असतं ते थंडावा देणाऱ्या वस्तूंच्या दानाचं त्याच बरोबर शेतकरी बांधवांसाठी पहिल्या पेरणीचं . ही पेरणी शेतातली नाही तर परसातल्या भाजीपाल्याची. आळ्यातल्या वेलांची.

याच दिवशी कोल्हापूरकर आतुरतेने वाट बघतात ती संध्याकाळ ची. आज आमची आई अंबाबाई झुल्यावर बसणार ! संध्याकाळी चार वाजले की देवीचे चोपदार वाजंत्री आईला बोलावण करायला गाभाऱ्यात जातात. तोवर इकडे गरुड मंडपात चांदीनं मढवलेलं सिंहासन फुलांनी सजवून चारी बाजूंनी दोऱ्या बांधून गरुड मंडपाच्या लाकडी छताला ( याला तख्तपोशी म्हणतात) बांधल जातं. साधं खणाच वस्त्र नेसून आई साहेब पुजाऱ्यांच्या हातातून सनई ताशाच्या नादात मंडपात येतात. रथोत्सवा प्रमाणे हवालदार खांडेकर दागिने घेऊन हजर होतात.

अंबाबाई जगन्माता म्हणून नाही तर एखाद्या नवपरिणीते प्रमाणं सगळ कोडकौतुक करून घेते. साज ,चाफेकळी, मोहनमाळ, तन्मणी अशा अनेक पारंपरिक दागिन्यांबरोबर तीचा खास रत्नजडीत किरीट कुंडलं असे दागिने घालते. देवीचा शृंगार पूर्ण झाला की पुजाऱ्यांच्या घरच्या स्त्रीयां , देवीच्या शागिर्दाने देवस्थानच्या स्वयंपाकघरातला तसेच आपल्या घरुन आणलेली कैरीची डाळ, पन्हं पानसुपारी महाकाली महालक्ष्मी महासरस्वतीला देऊन गरुड मंडपात येतात.

मग सुरू होतो करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी च्या चैत्री हळदीकुंकवाचा सोहळा. चोपदार झोके देतायत आणि आई अंबाबाई सनई चौघड्याच्या तालावर मंद झुलतेय. रात्री आठ वाजेपर्यंत हा सोहळा असाच रंगतो. महिला येतात हळदीकुंकू करतात. दरवर्षी च हे दृश्य .

हा दोलोत्सव अर्थात हिंदोळा हे प्रतिक आहे बदलत्या सृष्टी चक्राचं . झोपाळ्यावर बसून झुलणारी जगदंबा मूर्त रुप आहे या सृष्टीचं जिला वसंत ऋतू च्या रुपानं नवनिर्मिती ची चाहूल लागली आहे.तिचा सृजनाचा सोहळा चैत्राला सुरू झाला. म्हणून एखाद्या नवयुवती प्रमाणे ती झोपाळ्यावर बसून झुलतेय. हा नवनिर्मिती चा सोहळा पूर्ण होईल अश्विनाला जेव्हा भरलेल्या पिकासह ती आपलं जगन्माता हे नाव सार्थ करेल. पण आज ती कुणाची स्वामिनी नाही असुर मर्दिनी नाही तर ती आहे एक सृजनाला आतुर मुग्धा, आपल्याच विश्वात रमलेली सौंदर्यवती मानिनी. अशावेळी खरतर तिला काहीच मागू नये कारण ती तिच्या आनंदात रममाण आहे.

श्रीमातृचरणारविंदस्य दास प्रसन्न सशक्तीकः असे म्हणत देवीला मनोभावे नमस्कार केला जातो.