सोलापूर-सांगली-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ ला यापूर्वीच मंजुरी मिळाली असून त्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादन प्रक्रिया सुरू आहे. राज्य शासन जोपर्यंत ८० टक्के भूसंपादन करून देत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प हाती घेता येणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर दक्षिणचे भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांना पाठविलेल्या पत्राद्वारे दिले आहे.
सोलापूर-सांगली-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर मोठय़ा प्रमाणात वाहतूक असून हा संपूर्ण परिसर जलसिंचनाच्यादृष्टीनेही समृध्द आहे. त्यामुळे या महामार्गाचा समावेश राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत चौपदरीकरण किंवा सहा पदरीकरणामध्ये करण्याची मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. त्या वेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने नुकतेच रत्नागिरी-नागपूरच्या चौपदरीकरणाची घोषणा करून कालबध्द नियोजन करून पूर्ण करण्याची घोषणा गडकरी यांनी केली होती. हा महामार्ग सोलापूर-सांगली-कोल्हापूर महामार्गाशी संलग्न आहे. पुढे राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ म्हणजे तुळजापूर-नांदेड-वर्धा-नागपूर विभागालाही जोडणारा आहे. त्यामुळे हा रस्ता चौपदीरकण झाल्यास दोन विभाग जोडले जातील, असा मुद्दा आमदार देशमुख यांनी उपस्थित केला होता. सोलापूर-सांगली-कोल्हापूर हा महामार्ग चौपदरीकरऱ्णाच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट झाला असून त्याची गतिमान पध्दतीने प्रक्रिया सुरू व्हावी, अशी अपेक्षा आमदार देशमुख यांनी गडकरी यांना पाठविलेल्या पत्रात व्यक्त केली होती. त्यावर गडकरी यांचे उत्तर प्राप्त झाले आहे. यात केंद्र सरकारच्या धोरणानुसार जोपर्यंत ८० टक्के भूसंपादन होत नाही, तोपर्यंत काम सुरू करता येणार नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले.