कोल्हापूर : कागल येथील राजमाता जिजाऊ महिला समितीने महिला दिनाच्या निमित्ताने राजे सहकारी बँकेच्या माध्यमातून ११ महिलांना व्यवसायासाठी कर्ज मंजुरीचे पत्र वितरित केले. या उपक्रमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे पुढचे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी केले. भाजपचे जिल्हा अध्यक्ष, शाहू समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, आज महिला सबलीकरण, सक्षमीकरण याबाबत बोलले जाते. काही जण साडय़ा-भेटवस्तू देतात. पण कागलमध्ये पारंपरिक राजकारण, प्रथेला फाटा देऊन महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी व्यवसायासाठी कर्जपुरवठा, प्रशिक्षण, विक्रीसाठी व्यासपीठ उपल्बध करून नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. नंदितादेवी घाटगे, श्रेयादेवी घाटगे, पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके-पाटील, वर्षां पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अशोकराव देशमुख यांचे ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ विषयावर व्याख्यान झाले. महिला बचत गटाच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला.