कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या मूर्तीची मूळ जागी पुनर्प्रतिष्ठापना होऊन ३०६ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रविवारी कुंकुमार्चन उपासनेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५ हजार महिलांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा कुंकुमार्चन सोहळा असल्याचे संयोजक श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी सांगितले. गणेश वंदनाने सुरुवात झाली. महालक्ष्मीचा जागर, गोंधळ भालकर्स अकॅडमीने सादर केला. त्यानंतर मुख्य कार्यक्रमास प्रारंभ झाला. देवीची एक हजार नावे घेत कुंकुमार्चन झाले. कोल्हापूरसह पुणे, मुंबई ,गोवा व सीमा भागातील महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाग्यवान सोडत काढण्यात आली. पाच सोन्याच्या नथ, पाच सौंदर्य प्रसाधन संच व २० पैठणी साड्या बक्षीस देण्यात आल्या. श्री देवीची आरतीने सांगता झाली. प्रल्हाद पाटील यांनी सूत्रसंचालन केले. उपासक महिलांनी श्री महालक्ष्मी अन्नछत्र येथे भोजन प्रसाद घेतला. राजू मेवेकरी, संजय जोशी, राजेश सुगंधी, तन्मय मेवेकरी, सुनील खडके, विराज कुलकर्णी, प्रशांत तहसीलदार,कर्मचारी आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.