कोल्हापूर : पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या पालखी स्वच्छता सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने ९ कोटी निधीस मंजुरी दिली आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी दिली. पंढरपूरची आषाढी वारी निर्मल वारी होण्यासाठी यामुळे मदत होणार आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ग्रामपंचायतींना अनुदान देण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले. पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यांतून विविध संतांच्या पालख्या सोबत मार्गक्रमण करणाऱ्या वारकर्यांना सोयी सुविधा पुरविण्यासाठी ३ जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींना २ कोटी ५९ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे ८२ लाख , सातारा २० लाख २५ हजार रुपये तर सोलापूर जिल्हा परिषदेला दीड कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येणार आहे. ५० टक्के निधी राज्य शासनाने उपलब्ध करून दिला असून उर्वरित निधी जिल्हा परिषदांनी स्वनिधीतून अथवा अन्य निधीतून उपलब्ध करावयाचा आहे. भाविकांना स्वच्छता पुरविण्यासाठी भाडेतत्त्वावर तात्पुरत्या शौचालयाची व्यवस्था करण्यासाठी ६ कोटी ७२ लाख वीस हजार रुपयांचा निधी पुणे जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असल्याची माहितीही मुश्रीफ यांनी दिली.