बेळगाव, भालकीसह सर्व भाग पुन्हा महाराष्ट्रात समाविष्ट करणार अशा घोषणा देणाऱ्या महाराष्ट्रात, या प्रश्नाची रणभूमी असलेल्या चंदगड तालुक्यात या विषयावरील ‘मराठी टायगर्स’ या मराठी चित्रपटाला जनआंदोलनाच्या रेटय़ानंतर अखेर एका खेळास परवानगी दिली आहे. सीमा प्रश्नासाठी लढणाऱ्या मराठी बांधवांकडून याविरुद्ध संतप्त सूर उठत आहे. सीमाप्रश्न कृती समितीच्या समन्वयक असलेल्या चंद्रकांत पाटील पालकमंत्री असलेल्या कोल्हापूर जिल्हय़ातच या चित्रपटाच्या या मुस्कटदाबीने मराठी जनतेत संतापाची भावना उमटत आहे.
कर्नाटकातील बेळगाव, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र होण्यासाठी गेली सहा दशके मराठी भाषक संघर्ष करीत आहेत. कर्नाटक शासनाने मराठी बांधवांची जळी-स्थळी कोंडी करण्याचा प्रयत्न चालविला असून त्यांच्या जुलमाविरुध्द मराठी भाषक दडपण झुगारून देऊन लढा देत आहेत. गतवर्षी बिळूर या गावात मराठी भाषेत लिहिलेला ‘बिळूर -महाराष्ट्र राज्य’ नावाचा चौथरा कर्नाटक प्रशासनाने जमीनदोस्त केल्यावर मराठी बांधवांनी तो रातोरात उभा करून आपल्या भावनांचे दर्शन घडवले होते.
या कथासूत्राला कवेत घेणारा ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट बनविण्यात आला आहे. शिवसेनेचे उपनेते असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी यामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सीमाभागातील वातावरण चांगलेच तापले होते. कर्नाटक शासनाने चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली. यामुळे बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषकांना चित्रपट पाहण्याच्या उंचावलेल्या अपेक्षेवर पाणी सोडण्याची वेळ आली. याला पर्याय म्हणून कोल्हापूर जिल्हय़ातील चंदगड तालुक्यात खास तंबू उभा करून ‘मराठी टायगर्स’ हा मराठी चित्रपट दाखविण्याची सोय करण्यात आली. पण येथेही दुर्दैव आड आले. चंदगडचे तहसीलदार अप्पासाहेब सिमदर यांनी कायदा सुव्यस्थेकडे बोट दाखवत चित्रपट प्रदर्शनाला बंदी घातली. मराठी बाणा जपणाऱ्या कोल्हापुरातच चित्रपट प्रदíशत होणार नसल्याने महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमेवरील मराठी बांधव संतापून उठले. त्यांनी या अन्यायाविरोधात जोरदार आवाज उठवला. त्याची दखल घेऊन पालकमंत्री पाटील व जिल्हाधिकारी यांनी दररोज एक खेळ दाखविण्यास परवानगी दिली. याचा आनंद साजरा करताना कर्नाटकातील मराठी भाषकांनी भगवा झेंडा हातात घेऊन जल्लोषी वातावरणात मिरवणूक काढून चित्रपट पाहिला.