कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र शासनाचा तीव्र विरोध आहे. याबाबत बुधवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. राज्य शासनाच्या वतीने करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शनिवारी दिली.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापुराला कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरण कारणीभूत असल्याचा निष्कर्ष जलतज्ज्ञांनी काढलेला आहे. या महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र पूरबाधित होते. अनेक गावांना स्थलांतर करावे लागते. परिणामी दीड ते दोन महिने जिल्ह्यातील दळणवळणासह सर्व यंत्रणा ठप्प होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान महापुरामुळे झालेले आहे.अलमट्टी धरणातून विसर्ग वेळेत न केल्यामुळे त्याचा फुगवटा पाठीमागील बाजूस येत असतो. त्यामुळे कोल्हापूर, सांगलीला दर वर्षी पुराचा फटका बसत आहे. याच दरम्यान कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत सुरू केलेल्या हालचालीमुळे दोन्ही जिल्ह्यांमध्ये पूरबाधित शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
प्रसंगी न्यायालयीन लढा
राज्य शासन अलमट्टी धरणाच्या उंची विरोधात ठाम आहे. प्रसंगी न्यायालयीन लढा देण्यासाठी सज्ज आहे. या प्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हेदेखील संवेदनशील आहेत, असे आबिटकर म्हणाले.