कोल्हापूर  शहरातील रस्ते विकास प्रकल्पांतर्गत टोल कायमचा रद्द करण्यासाठी दिलेली तीन महिन्यांची मुदत संपत आली, तरी अद्याप निर्णय घेतलेला नाही. म्हणून टोलविरोधी कृती समितीच्या वतीने १६ नोव्हेंबर रोजी शिरोली नाक्यावर आंदोलन करण्याचा निर्णय प्रा. एन. डी. पाटील यांनी जाहीर केला.
गेली पाच वष्रे आयआरबी कंपनीने सुरू केलेला टोल रद्द करावा यासाठी टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलन सुरू असूनही पूर्वीच्या आघाडी सरकारने व सध्याच्या युती शासनाने टोल कायम स्वरूपी रद्द केला नाही. पण तीन महिन्यांपूर्वी युती शासनातील मंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे पाकलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुनर्मूल्यांकन समिती नेमून त्यानंतर व्यापक बैठक घेऊन टोल रद्द करण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली. तात्पुरती तीन महिन्यांसाठी टोल वसुलीला स्थगिती दिली. या दरम्यान टोल रद्द करण्याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
ही तीन महिन्यांची मुदत २५ नोव्हेंबर रोजी संपत असून अद्याप टोल रद्दबाबत निर्णय झाला नसल्याने टोलविरोधी कृती समितीच्या वतीने बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात आली. यामध्ये १६ नोव्हेंबर रोजी शिरोली टोल नाक्यावर रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करून पुन्हा आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याची घोषणा कृती समितीचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी केली. या वेळी ते म्हणाले, की कृती समितीने चच्रेचे दरवाजे बंद केलेले नाहीत. पण बोलविण्याची वाट न पाहता चळवळीचा रेटा कायम ठेवून आंदोलनाची पुढील दिशा ठरवायची आहे. रस्त्यावर आल्याशिवाय चच्रेचा घोळ संपणार नाही. म्हणून १६ तारखेला मोठय़ा संख्येने रस्त्यावर येऊन आंदोलन करायचे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा व धरणे आंदोलन केले जाईल.
या बठकीत निमंत्रक निवास साळोखे यांनी बठकीचा उद्देश सांगताना या पूर्वीच्या मुंबईतील मंत्र्यांसमवेत झालेल्या बठकीचा आढावा घेतला. त्या वेळी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत मुदत संपेपर्यंत वाट न पाहता आंदोलनाबाबत भूमिका घेतली पाहिजे, असे सांगत या वेळी बाबा इंदूलकर, अॅड. पंडितराव सडोलीकर, आर. के. पोवार, चंद्रकांत यादव, जयकुमार शिंदे, बजरंग देसाई, गणी आजरेकर यांनी यापुढे होणा-या आंदोलनात सहभागी होणार असून आंदोलन तीव्र केले पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या.