कोल्हापूर : पन्हाळगड संवर्धनासाठी रविवारी भर पावसात आंदोलन करण्यात आले. गडकोट बचावसाठी मोठ्या संख्यने गडकोटप्रेमी गडावर जमल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आंदोलकांनी पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

महाराष्ट्रातील गड किल्ले, शिवकालीन वास्तूंची मोठ्या प्रमाणात पडझड होऊ लागली आहे. पुरातत्व खाते याकडे गांभीर्याने पहात नाही. शिवप्रेमी सुधारण करू लागले तर त्यात ते आडकाठी आणतात. गडकोट नामशेष होण्याची भीती आहे. यासाठी जिल्ह्यातील शिवप्रेमींनी एकत्र येऊन ऐतिहासिक पन्हाळगडावर गडकोट संवर्धनाबाबत आंदोलन केले.

आंदोलनाची सुरवात वीर शिवा काशीद,वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. जय शिवाजी जय भवानी, पन्हाळगड झांकी है विशाळगड बाकी है या घोषणांनी परिसर दुमदुमला.छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात दर्शन घेऊन आंदोलनास सुरवात करण्यात आली. यावेळी राज्यातील सर्व ऐतिहासिक गडकिल्ले व मावळ्यांची जन्म स्थळे आणि शिवकालीन वास्तूंसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून संवर्धन करावे,यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. 

प्रशासनाची तारांबळ

हजारो आंदोलक आल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. आंदोलक पुरातत्व खात्याच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी जातील असे वाटत होते,पण त्यांनी अधिकाऱ्यांना आंदोलक ठिकणी येणे भाग पाडले. भेदरलेले पुरातत्व खात्याचे संरक्षक अधिकरी विजय चव्हाण दबकत दबकत कडक पोलीस बंदोबस्तात येऊन निवेदन स्वीकारून गेले. पोलीस उप-अधीक्षक रवींद्र साळोखे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.