दयानंद लिपारे

जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नामविस्तार समारंभासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी दिल्यानंतर कोल्हापुरात राजकीय फेरबांधणीचे संकेत मिळाले आहेत. हा दौरा कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची बांधणी पकड अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न होणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

चांदीनगरी हुपरी (तालुका हातकणंगले) येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नाव विस्तार ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ असा करण्यात आला आहे. हा नामविस्तार समारंभ केंद्रीय मंत्री केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक आमदार आवाडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत दिली.

विधानसभा निवडणुकीनंतर आवाडे यांनी भाजपशी संबंध वाढवले आहेत. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आवाडे यांनी विधानसभेची निवडणूक त्यांच्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढवली होती. त्यात विजयी झाल्यानंतर त्यांनी राज्यातील भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. आघाडी सरकारकडून पुरेशी मदत, सहकार्य केले जात नाही, असे ते पत्रकार परिषद, जाहीर समारंभ, मंत्र्यांच्या उपस्थितीत अनेकदा बोलूनही दाखवत होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आवाडे यांचे नाव जोडले जात आहे. गेल्या आठवडय़ात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजीतील भाजप कार्यालयाला भेट प्रसंगी इचलकरंजी महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी भाजपला वस्त्रनगरीच्या विकासाबद्दल मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. तो येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल, असे सांगत भाजप आणि आवाडे यांच्यात युती होणार असल्याचे सूतोवाच केले होते. याबाबत माजी आमदार सुरेश हाळवणकर यांचीही भूमिका महत्त्वाची असल्याने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, आवाडे यांनी जवाहर कारखान्याच्या नामविस्तारासाठी केंद्रीय मंत्री शहा यांना निमंत्रित करणार असल्याचे सांगितले आहे. या कार्यक्रमाबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुखांची चर्चा झाली आहे. परतीचा पाऊस संपल्यानंतर हा कार्यक्रम घेण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात येते. अमित शहा यांच्या दौऱ्यात जिल्ह्याची भाजपची बांधणी अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न राहणार आहे. याच वेळी आमदार आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असाही तर्क व्यक्त केला जात आहे. याशिवाय जिल्ह्यातील आणखी काही प्रमुखांनाही भाजपच्या छावणीत आणण्याच्या हालचाली आहेत.

 इतकेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक मजबूत करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यात भाजपचा प्रभाव अधिक वाढीस लागला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील शिंदे-भाजप यांना मानणारा वर्ग वाढत चालला आहे. सांगली जिल्ह्यातही भाजपचे बळ वाढत आहे. त्यामुळे या चारही जिल्ह्यांत भाजप अधिक मजबूत करण्याचा शहा यांची रणनीती राहणार असे दिसत आहे. या दृष्टीने शहा यांचा दौरा जंगी करण्याचे नियोजन दिसत आहे.