इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका करण्याचा निर्णय घाई गडबडीने घेण्यात आला. महापालिका होऊन नेमका काय फरका पडला? असा सवाल आमदार प्रकाश आवाडे यांनी शनिवारी उपस्थित केला.सफाई कर्मचार्यांचा प्रलंबित वारसा हक्क, पाणीटंचाई दूर करण्यासाठी निधी आणि वाहनधारकांसाठी ब्रेक टेस्ट ट्रॅक सुरु करण्यास प्रशासकीय मंजूरी आणल्याबद्दल आमदार आवाडे यांचा नागरी सत्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.इचलकरंजीत आगमन होताच क्रेनच्या सहाय्याने २१ फुटाचा पुष्पहार घालून आवाडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रमुख मार्गावरुन धनगरी ढोल, झांजपथक, हलगी वादन आदी वाद्यांच्या गजरात स्वागत मिरवणूक काढण्यात आली.
मागील अडीच वर्षात पालकमंत्री असताना इचलकरंजीची कामे जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवण्यात आली असा आरोप आमदार सतेज पाटील यांचा नामोल्लेख न करता केला. राज्यात सर्वसामान्यांचे सरकार येताच ती कामे मजूर करुन दाखविली. शिवराज्याभिषेक दिनी ( २ जुन ) कॉ. मलाबादे चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भूमीपुजन करण्यात येईल, अशी घोषणा आवाडे यांनी केली.ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत तर प्रास्ताविक अहमद मुजावर यांनी केले. सूत्रसंचालन अरुण निंबाळकर व रमेश पाटील यांनी केले. आभार चंद्रकांत पाटील यांनी मानले. प्रकाश मोरे, स्वप्निल आवाडे, बाबासाहेब चौगुले, बाळासाहेब कलागते, शेखर शहा, रणजित जाधव, दादा भाटले आदींसह कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.