पद मिळालं तरी पोच येत नाही. अशा काही व्यक्ती असतात. त्यांच्याकडून चुकीची विधाने केली जातात, अशा शब्दात मनसे नेते राज ठाकरे यांनी मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्यावर ताशेरे ओढले. त्यांना कोणी स्क्रिप्ट लिहून दिले देते का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी अवमानकारक विधान केले आहे. त्यामुळे त्यांना राज्यपाल पदावरून हटवावे ,अशी मागणी राज्यात विरोधी पक्ष व विविध संघटनांकडून केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांवरचं बोट
याबाबत येथे पत्रकारांनी विचारले असता राजे ठाकरे म्हणाले, महत्त्वाच्या प्रश्नावरील लक्ष विचलित करण्यासाठी चुकीची विधाने करण्याची पद्धत पडत आहे. अशा लोकांचे पेव फुटले आहे. याला माध्यमे कारणीभूत आहेत. याबाबत मी काही संपादकांशी बोललो आहे. याला पत्रकारांनीच रोखले पाहिजे, असा उल्लेख करून ठाकरे म्हणाले, काही व्यक्तींना पदे मिळाली तरी त्याची पोच येत नाही. कोठे काय बोलावे हेच त्यांना समजत नाही. अशांना कोणी स्क्रिप्ट लिहून देते का? विषारी विधाने करण्याचे विषवल्ली पसरत आहे, अशी चिंता ही त्यांनी व्यक्त केली.

आता दौरे कसे सुरू?
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे कोविड बाधा, करोना संसर्ग याचे कारण सांगून लोकांना भेटत नव्हते. कोणी भेटायला गेले तर करोना तपासणीच्या नावाखाली तासनतास बसवून ठेवले जात असे. मुख्यमंत्रीपद गेल्यावर लगेच त्यांचे राज्यभर दौरे सुरू झाले आहेत. आता प्रकृतीची कारणे कोठे गेली आहेत. यामुळेच मी त्यांच्या प्रकृती विषयी बोललो नाही तर त्या परिस्थितीची चेष्टा केली होती, असे स्पष्टीकरणही राज ठाकरे यांनी केले.

मनसे वाढणार
मनसेचा अपेक्षा राज्यात अपेक्षित विस्तार झाला होताना का दिसत नाही, अशी विचारणा केली असता राज ठाकरे म्हणाले, कोणताही पक्ष रुजण्यास, विस्तारण्यास काही अवधी लागत असतो. १९६६ शिवसेनेची स्थापना झाली. सुरुवातीला हा पक्ष मुंबई पुरता मर्यादित आहे अशी हेटाळणी होत होती. पुढे राज्यात सत्ता मिळवण्याच्या हा पक्ष सक्षम झाला. मनसेही याच गतीने वाढत राहील, असा विश्वासही राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

बोंमईनवर टीका
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंमई यांनी सीमाप्रश्नी वादग्रस्त विधान केले आहे. याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही त्याबाबत आत्ताच वादग्रस्त विधान करण्याची प्रवृत्ती कुठून येते? अशी बोंमई यांच्यावर टीका करून महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी असे वादाचे प्रश्न उपस्थित केले, जातात असेही ते म्हणाले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray criticizes governor bhagat singh koshyari amy
First published on: 29-11-2022 at 20:40 IST