ऊसाला एफआरपी पेक्षा एसएमपी (किमान वैधानिक किंमत) मिळणे अधिक फायदेशीर आहे. एफआरपी घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे म्हणणारे राजू शेट्टी सारखे शेतकरी नेते हेच शेतकऱ्यांना बुडवणारे आहेत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी मंगळवारी येथे केली.

कोल्हापूर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने येथे आयोजित केलेल्या ऊस परिषदेत मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. संघटनेचे प्रवक्ते अशोक खरात, युवा आघाडी प्रमुख रामेश्वर गाडे, उपाध्यक्ष ऍड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट,.शिवाजी नांदखिले, महिला आघाडी अध्यक्ष वर्षा काळे यांची भाषणे झाली. संजय रावळ यांनी स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ऍड.माणिक शिंदे यांनी प्रास्ताविक केले.

तर ४ हजार दर

राज्यकर्ते आणि साखर कारखानदार यांच्या भल्यासाठी एसएमपी संपुष्टात आणून एफआरपी आणण्याचा घाट घातला गेला आहे, असा आरोप करून पाटील म्हणाले. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. याविरोधात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आवाज नाही तर केवळ चळवळीला काही अर्थ नाही. संघटनेच्या मागण्यांचे फलक गावोगावी लावले तर सहा महिन्यांमध्ये ऊसाला प्रतिटन ४ हजार दर मिळवून देतो. चार हजार रुपये दर द्यायला जमत नसेल तर किमान साखर कारखाना अंतराची अट कमी करून नवे साखर कारखाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.