उसात काटामारी करून राज्यातील साखर कारखानदारांनी ४५८१ कोटींचा दरोडा टाकला आहे , असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज (रविवार) केला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “महाराष्ट्रातील साखर कारखाने राजरोसपणे वजनाच्या सरासरी १० टक्के काटा मारतात. मागील हंगामात महाराष्ट्रात १३ कोटी २० लाख टन उसाचे गाळप झाले. म्हणजेच काटामारून १ कोटी ३२ लाख टन उसाची चोरी झाली. राज्याचा सरासरी उतारा ११.२० टक्के आहे. याचा अर्थ १४.७८ लाख टन एवढ्या साखरेची चोरी झाली असा होतो.”

दरोडेखारांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत? –

तसेच, “साखर आयुक्तांच्या परवानगी शिवाय कोणत्याही कारखान्याला वजन काट्याशी छेडछाड करता येणार नाही, असा आदेश का निघत नाही? ही साखर किरकोळ किराणा दुकान, मिठाईवाले, शितपेयांच्या कंपन्यास विना पावतीची विक्री केली जाते. सरकारने निश्चित केलेल्या दराप्रमाणे याची किंमत ४५८१ कोटी तर शासनास मिळणाऱ्या जीएसटी रूपातील कर हा २२९ कोटी रूपये होतो. किरकोळ व्यापाऱ्यांवर धाडी टाकणारे जीएसटी खाते गप्प का आहे? दरोडेखारांच्या मुसक्या आवळल्याच पाहिजेत.”, अशी मागणी देखील शेट्टी यांनी केली.