सातारा : जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र आहेत. मात्र जिल्ह्यातील भाजपची भूमिका माहिती नाही. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे स्पष्ट प्रतिपादन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केले.

पाटण मतदारसंघातील जनता दरबार आणि पालकमंत्री आपल्या दारी या उपक्रमांची माहिती देते वेळी पत्रकारांशी संवाद साधला.

देसाई म्हणाले, की सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा गुंता सुटलेला नाही. महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकमेकांच्या रणनीतीला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय जनता पार्टीकडून अद्याप सत्ता स्थापनेबाबत चर्चेचा प्रस्ताव आलेला नाही. त्यांची भूमिका काही समजलेली नाही. प्रस्ताव आल्याशिवाय त्यांच्याशी कोणती चर्चा होणार नाही. चर्चा झाल्यास शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार पक्ष हा एकत्र आहोत, असे थेट स्पष्टीकरणही देसाई यांनी दिले.

भारतीय जनता पार्टीचे नेते जे बोलतात ते करत नाहीत. माझे पालकत्व घेण्याचे अथवा मला मिठी मारण्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले; मात्र ते फारसे गांभीर्याने नव्हते. शिवसेनेला या निवडणुकीत चांगले यश मिळाले आहे. पूर्वी आमचे फक्त पाटणमधून तीन सदस्य होते. आता जिल्हाभरातून पंधरा सदस्य आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी भेट घेणार असून, येथील सर्व परिस्थिती त्यांना सांगितली जाईल. त्यांच्या आदेशाप्रमाणे पुढील निर्णय होतील, असे त्यांनी सांगितले.

आमची गटनोंदणी झाली आहे. राष्ट्रवादीची गट नोंदणी सोमवारपर्यंत पूर्ण होईल. निवडणुकीच्या प्रचारात भाजपने पातळी सोडून प्रचार केला. मतदार संघातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही महायुतीचा धर्म पाळला. मी, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोणावरही एकतर्फी टीका केली नाही. प्रचारात भाजपने अवलंबलेल्या भूमिकेवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तशीच काहीशी भूमिका निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचीही आहे.

आम्ही युती धर्माचे पुरेपूर पालन केले. मात्र माझ्यावर आणि वाईच्या मतदार संघात मकरंद पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. एकेरी विशेषणे लावली. मात्र, आम्ही कोणतीही एकतर्फी टीका केली नाही असे त्यांनी सांगितले. सांगली महापालिका निवडणुकीतही जागावाटप करताना आम्हाला दुय्यम वागणूक देण्यात आली. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांची आणि कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठांच्या कानावर घातली जाईल, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

आमचा ए प्लॅन आहे. आम्हाला बी प्लॅन ची गरज नाही असे सूचक विधानही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा जिल्ह्यात भाजप कडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आला नाही. मात्र अजित पवार पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना आम्ही एकत्र आहोत .सत्ता स्थापनेचा कोणताही निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही त्यासाठी तिन्ही घटक पक्षांच्या वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्हाला एकत्र चर्चा करावी लागेल तसेच समीकरण तयार झाल्यास आम्ही समोरासमोर बसून चर्चा करू .