कोल्हापूर : शरद पवार यांनी आयुष्यभर जातीजातींमध्ये भांडणे लावत स्वत:चे राजकारण केले. हा संघर्ष निर्माण करून त्यांना एकमेकांत भिडवायचे हाच उद्योग त्यांनी सतत केला. परंतु त्यांचा हा चेहरा आता जनतेच्या आणि समाजातील अनेक जातींच्या लक्षात आल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे केली.

कोरेगाव भीमाप्रकरणी संभाजी भिडे यांचे नाव वगळण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर पाटील पत्रकारांशी बोलत होते. पवारांवर टीका करताना ते म्हणाले, की पवारांनी कायम हिंदु जातीजातींमध्ये विष पेरत भांडणे लावण्याचे काम केले. मराठा, ओबीसींमध्ये, मराठा-मराठेतर अशी भांडणे लावली. ही भांडणे लावतच एका समाजाला आपल्याकडे खेचण्याचा आणि त्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांनी आजवर केला. परंतु हे सर्व प्रयोग आज त्यांच्याच अंगलट येत आहेत.