सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीमध्ये राष्ट्रवादी व शिवसेनेच्याच सदस्यांचा आम्हाला सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न होता. त्यांचे बहुमत नसल्याने त्यांनी बहिष्कार टाकला. भाजपने प्रसार माध्यमांसमोर जी वस्तूस्थिती मांडली ती वेळोवेळी सिद्ध झाली आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी व शिवसेना सदस्यांचा मतदान प्रक्रिया बहिष्कार काळात भीती दाखवून करण्यात आलेला निषेध त्यानंतर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर झालेले धरणे आंदोलन या पार्श्वभूमीवर बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी भाजपचा निवडणूक प्रमुख या नात्याने आपली बाजू मांडली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, राष्ट्रवादी व शिवसेनेचे सदस्य हे आता रडीचा डाव खेळत आहेत. अर्ज भरण्यासाठी दहा ते बारा वेळ होती. केवळ पंधराच मिनिटे वेळ दिला, असे नाही. प्रशासन आणि प्रसार माध्यमे येथे उपस्थित आहेत. सर्व प्रकार आपल्यासमोरच घडतो आहे. त्यांनी केलेले हे आरोप अत्यंत चुकीच्या स्वरूपाचे आहेत. शेवटी मतदान प्रक्रियेत बहुमताचा विषय होता. शिवसेना व राष्ट्रवादीच्या सदस्यांना आपल्याकडे बहुमत नाही, याची पूर्ण कल्पना होती.

जिल्हा परिषदेच्या राजकारणात उघडे पाडण्यापेक्षा त्यांनी बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली. सातारा जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्ही बंद होते. या प्रश्नावर बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, प्रत्यक्ष निवडी झाल्यानंतर आम्ही सभागृहामध्ये आलो. आम्ही ते बंद करायचा विषयच नव्हता. याबाबत अध्यक्ष ,उपाध्यक्ष योग्य ती चौकशी करून माहिती घेतील. त्यांनी गरज वाटल्यास चौकशी समितीने याची चौकशी करावी. भाजपने खऱ्या अर्थाने युती धर्म पाळला आहे, त्याचे आकलन शिवसेना राष्ट्रवादीच्या नेत्यांना होत नाही, असा दावा शिवेंद्रसिंहराजे यांनी केला. शिपायांनी निरोप पाठवलेल्या बैठकांना आम्ही कसे उपस्थित राहायचे, असा टोलाही त्यांनी लगावला.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, सीसीटीव्ही बंद होते अथवा चालू होते त्याने काय फरक पडला असता. निवडणुकीच्या निकालात काही फेरबदल झाला असता का, असा दावा त्यांनी केला. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडी कागदोपत्री झाल्या त्याचे रेकॉर्ड आहे. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध आहे. ही वस्तूस्थिती आहे ती बदलता येत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची जिल्हा परिषद त्यांच्यात विचाराने पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. पालकमंत्री म्हणतात, पुढे पाच वर्षे आहेत ते आम्हालाही ठाऊक आहे.

पाच वर्षे कसा राज्यकारभार करायचा, हे सुद्धा आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, असा टोला जयकुमार गोरे यांनी शंभुराज देसाई यांना लगावला. दोष आमच्यावर द्यायचा आणि धमकी त्यांनी द्यायची, हा प्रकार जिल्हा परिषदेत सातत्याने घडलेला आहे. जी लोक मनापासून आमच्याकडे आले आहेत, त्यांना आम्ही फोडले, असे कसे म्हणता येईल. ज्यांना आपले स्वतःचे सदस्य सांभाळता येत नाहीत, त्यांनी आमचे सदस्य फोडले, असे म्हणणे गैर आहे, असा टोलाही गोरे यांनी लगावला.