पंढरपूर : यंदाच्या उन्हाळ्यात सोलापूर शहराने तापमानात उच्चांक गाठला आहे. रविवारी सोलापुरात कमाल तापमान ४४ अंश सेल्सिअसवर पोहोचले. विशेष म्हणजे, किमान तापमानही २८.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेल्याने सोलापूरकरांना दिवसापाठोपाठ रात्रीही असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. हवामान अभ्यासकांच्या मते, मे महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानाचा हा आलेख आणखी वाढण्याची शक्यता असून, नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूरला विक्रमी पावसानंतर आता तापमानात देखील उच्चांकी वाढ होत आहे. या उन्हाळ्यात २७ एप्रिल रोजी ४३.९ अंश सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजेच २ मे रोजी तापमान थोडे कमी होऊन म्हणजे ४२.८ अंशांवर आले होते. हा या हंगामातील मे महिन्यातील सर्वांत कमी तापमानाचा दिवस २ मे ठरला. मात्र, हा दिलासा फार काळ टिकला नाही. अवघ्या काही दिवसांतच तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, रविवारी तो ४४ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. कमाल तापमानासोबतच किमान तापमान २८.४ अंश सेल्सिअस इतके वाढल्यामुळे रात्रीच्या वातावरणातही कमालीचा उकाडा निर्माण झाला आहे. दिवसभर तापलेली जमीन रात्रीही थंड होत नसल्याने नागरिक रात्रीच्या वेळीही घामाघूम होत आहेत. मे महिन्याच्या उत्तरार्धात ही स्थिती अशीच राहण्याची चिन्हे आहेत.
मे अखेरपर्यंतचा अंदाज
हवामान तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार, मे महिन्याच्या उर्वरित दिवसांत सोलापूरमधील उन्हाची तीव्रता कायम राहणार आहे. तापमान ४५ अंशा पार जाण्याची शक्यता आहे. मे च्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात पारा ४४.५ ते ४५.५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची दाट शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान असेच चढे राहिल्यास जिल्ह्यात ‘उष्णतेची लाट’ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच बरोबरीने मे अखेरीस वळवाचा पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २५ मे नंतर अरबी समुद्राकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता वाढेल. यामुळे दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन महिनाअखेरीस वादळी वाऱ्यासह वळवाचा पाऊस सोलापूर जिल्हा झोडपू शकतो, असा अंदाज आहे.
प्रशासनाचे आवाहन
उन्हाची ही तीव्र लाट पाहता नागरिकांनी दुपारच्या वेळी (१२ ते ४) अत्यंत महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी लिंबू सरबत, ताक, शहाळ्याचे पाणी आणि भरपूर पाण्याचे सेवन करावे, तसेच सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
