राज्य सरकारकडून यंदाच्या नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागातील प्राध्यापक डॉ. औदुंबर सरवदे यांच्या ‘बोलीविज्ञान’ या पुस्तकाला यंदाचा महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, बाल वाङमय कादंबरीसाठी साने गुरुजी पुरस्कार कोल्हापूरचे डॉ. श्रीकांत पाटील यांना पुरस्कार जाहीर झाला. हृदय प्रकाशनच्या 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' या पुस्तकासाठी त्यांना ५० हजार रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा बुधवारी २ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. त्यामध्ये प्रौढ वाङ्मय- भाषाशास्त्र, व्याकरण या साहित्य प्रकारासाठीचा १ लाख रुपयांचा नरहर कुरुंदकर पुरस्कार ‘बोलीविज्ञान’ पुस्तकाला जाहीर झाला. कोल्हापूरच्या भाषा विकास संशोधन संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. दरम्यान, याशिवाय आणखी काही पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कार विजेत्यांमध्ये सबी परेरा, डॉक्टर राणी बंग, करुणा गोखले, डॉक्टर मृदुला बेळे, डॉक्टर बाळ फोंडके यांचा समावेश आहे.