सांगली: विकास कामाच्या श्रेयवादावरून रविवारी वाळव्यात नायकवडी गट आणि आ. जयंत पाटील समर्थक गट यांच्यात तणाव निर्माण झाला होता. आमच्या कार्यकाळातच कामाची मंजुरी मिळाली असल्याने या कामाचे उद्घाटन आ. पाटील यांना करू देणार नाही अशी भूमिका नायकवडी गटाने घेतली होती यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वादाच्या पार्श्वभूमीवर आ पाटील यांच्या हस्तेच विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. वाळवा गावासाठी 15 कोटींची नळपाणी योजना आणि आष्टा व तुजारपूर रस्त्याच्या कामाचे उदघाटन आज आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. नुकतेच ग्रामपंचायत निवडणुकीत हुतात्मा पॅनेलच्या हातातून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता हस्तगत केली असल्याने या कामाचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यास नायकवडी समर्थकांचा तीव्र विरोध होता. आणखी वाचा- कोल्हापूर: मुश्रीफ यांच्या निवासस्थानी छापे; पुण्यापाठोपाठ कोल्हापुरातही ‘ईडी’ची कारवाई, अडचणीत वाढ आ. पाटील ग्रामपंचायत कार्यालयास भेट देउन कार्यक्रम स्थळी निघाले असता हुतात्मा चौकात उभे असलेले माजी सरपंच गौरव नायकवडी व त्यांचे समर्थक यांनी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजीही केली. याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजीनेच प्रत्युत्तर दिले. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. उप अधिक्षक पद्मा चव्हाण यांच्यासह पोलीस कर्मचार्यांनी तणावाची स्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आ. पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असल्यापासून पाठपुरावा करून मंजूर केलेल्या कामाचा शुभारंभ आम्ही केला तर त्यात वावगे काय? श्रेयवादाच्या राजकारणात विकास कामे अडकवू नका असा सल्लाही त्यांनी विरोधकांना यावेळी दिला. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक दिलीप पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेंद्र पाटील, नेताजी पाटील, प्रशांत थोरात, दीपक धनवडे, संदीप धनवडे आदी उपस्थित होते. प्रारंभी ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर शेळके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर शांताराम तगारे (सर) यांनी आभार मानले.