सातारा : फडतरवाडी (ता. कोरेगाव) येथे तब्बल ३९ खैर वृक्षांची तोड करून त्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना कोरेगाव वनविभागाने ताब्यात घेतले आहे. या कारवाईमध्ये खैरवृक्षाचे ३९ ओंडके ताब्यात घेण्यात आले आहेत.

उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक दिगंबर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगावच्या वन परिक्षेत्राधिकारी सुरेखा जगदाळे यांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये वनपाल सुभाष बडदे यांनी भाग घेतला होता. कोरेगाव वनविभागाच्या फिरत्या पथकाला फडतरवाडी येथे खैर वृक्षाची तोड असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली फिरत्या पथकाने घटनास्थळी जाऊन छापा मारला.

विजय नरळे, अजय कांबळे, रूपाली परदेशी यांना त्या ठिकाणी तीन इसम पळून जाताना दिसले. राहुल दुर्योधन गायकवाड, सूरज मीनानाथ अडागळे, जयदीप मीनानाथ आडगळे (रा. विखळे) या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तिघांनी मशिन कटरच्या साह्याने २९ खैर वृक्षांची लाकूडतोड केल्याचे स्पष्ट झाले. संबंधित मुद्देमाल आणि एक मोटरसायकल ताब्यात घेण्यात आली आहे. कोरेगाव न्यायालयात हजर केले असता, या तिघांना एक दिवसाची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. वन परिक्षेत्राधिकारी सुरेखा जगदाळे पुढील तपास करत आहेत.