सांगली : लग्नासाठी आलेली मुले रखरखत्या उन्हात पोहण्यासाठी येरळा नदीत उतरली असता एका तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तर बुडत असलेल्या सात मुलांना वाचविण्यात यश आले. यापैकी तीन मुलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाळवणी (ता. खानापूर) येथे ही घटना शनिवारी घडली.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील भाळवणी येथील शिकलगार मळ्यामध्ये येरळा नदीमध्ये पोहायला गेलेली आठ मुले नदीमध्ये बुडाली. त्यातील सात जणांना वाचविण्यात यश आले असून एका वीस वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. फिरदोस जाकीर शिकलगार असे या मुलीचे नाव असून तिचे मूळ गाव कोरेगाव आहे तर ती मुंबई येथे राहत होती.
भाळवणी येथे शिकलगार मळ्यामध्ये एका लग्न समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमास मुंबई तसेच इतर बाहेर गावातून मोठ्या प्रमाणावर पाहुणे आले होते. येथील शिवतेज मंगल कार्यालयामध्ये कार्यक्रम सुरू असताना काहीजण येरळा नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. त्यामध्ये १७ ते १८ लहान मुले व मुली होती. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचे पालक सुद्धा होते. ही सर्व मुले १२ ते १४ या वयोगटातील होती.
मुले पाण्यामध्ये खेळत असताना त्यांचे पालक नदीकाठावर पाहत उभा होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही मुले पाण्याच्या खोल प्रवाहामध्ये गेली. त्याचवेळी त्यांना वाचवण्यासाठी काही मुले धावली. या सर्व गोंधळामध्ये सात ते आठ मुले बुडाली. यावेळी नदीच्या काठावर असलेल्या पालकांनी व इतर सर्वांनी नदीमध्ये धाव घेऊन मुलांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यावेळी बुडालेल्या सात मुलांना वाचवण्यात आले. फिरदोस शिकलगार ही नदीच्या पाण्यामध्ये बुडाली.
सर्व बुडालेल्या मुलांना पाण्याबाहेर काढल्यानंतर तीन ते चार मुले अस्वस्थ होते. त्यांना विट्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. यावेळी फिरदोस जाकीर शिकलगार या वीस वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचे मूळगाव कोरेगाव होते तर ती मुंबई येथे वास्तव्यास होती.
