रणजीविजेत्या मुंबई संघाला विजेतेपदासोबत बीसीसीआयचे दोन कोटी रुपयांचे इनाम मिळाले. यासोबत एमसीएनेही रोख रकमेचे घसघशीत बक्षीस जाहीर केले होते. परंतु आकडा प्रसारमाध्यमांमध्ये स्पष्ट होऊ शकलेला नाही, असे मत रत्नाकर शेट्टी यांनी प्रकट केले होते. याबाबत सावंत यांनी रणजीविजेत्या मुंबईच्या खेळाडूंना दोन कोटी रुपये एमसीएकडून देण्यात येणार असल्याचे सांगितले. २००८पासून एमसीएचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभसुद्धा झाला नसल्याचे शेट्टी यांनी या वेळी निदर्शनास आणले. शुक्रवारी एमसीएची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली, याबैठकीमध्ये केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी करसवलतीच्या काही सुचना केल्या. याचप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तांत्रिक कारणास्तव सभेपुढे येऊ शकला नाही. आयपीएलच्या सामन्यांसाठी क्लब्सच्या सदस्यांना प्रत्येकी १० ते १२ तिकिटे राखीव ठेवावी, अशी मागणी क्लब्सच्या सदस्यांनी जोरदारपणे केली. पण आयपीएलसाठी एमसीएकडे असलेल्या १५ टक्के जागांचा आढावा घेऊन याबाबत धोरण निश्चित करण्यात येईल, असे एमसीएचे अध्यक्ष रवी सावंत यांनी सांगितले.
वानखेडे स्टेडियमवरील अतिसुसज्ज अशा पत्रकार कक्षाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव खंडाळा क्रिकेट क्लबने वार्षिक सर्वसाधारण सभेत आणण्याचा प्रयत्न केला. पण एमसीएच्या घटनेनुसार, हा प्रस्ताव सर्वप्रथम कार्यकारिणी समितीपुढे यावा लागतो. त्यानंतर हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे आणला जातो, हे अध्यक्ष रवी सावंत आणि प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी स्पष्ट केले.