भारताने विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना यजमान इंग्लंडशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत अंतीम फेरीत पोहचल्यास २०११ नंतर विश्वचषक जिंकण्याची भारताला संधी असेल. मात्र भारत जिंकण्याची स्वप्ने भारतीय चाहते स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच पाहू लागले आहेत. याचीच एक झकल नुकत्याच झालेल्या भारताच्या सामन्यामध्ये आली. या सामन्यात एका चाहत्याने कोहलीने काही महिन्यांपूर्वी केलेल्या वक्तव्याचे पोस्टर हातात पकडले होते. 'विश्वचषक जिंकल्यास इंग्लंडच्या रस्त्यांवर मी शर्ट काढून फिरेन' असं वक्तव्य विराटने मागील वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या कार्यक्रमात केले होते. याच वक्तव्यावरुन एका चाहत्याने भारत विश्वचषक जिंकल्यानंतर १५ जुलैला वृत्तपत्रांचा मथळा काय असेल याचे एक पोस्टरच तयार केले होते. या चाहत्याचा फोटो आता व्हायरल होताना दिसत आहे. काय म्हणाला होता कोहली २०१८ साली एप्रिल महिन्यामध्ये कोलकत्यात प्रसिद्ध क्रीडा पत्रकार बोरिया मुझुमदार यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली आणि विराट कोहली उपस्थित होते. यावेळी गांगुलीने भारत पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणारा विश्वचषक जिंकल्यास विराट माझ्याप्रमाणेच शर्ट काढून तेथील रस्त्यांवर आनंद साजरा करेल असे मजेशीर वक्तव्य केले होते. भारत विश्वचषक जिंकल्यावर विराट तुझ्यासारखं लॉर्डसच्या गॅलरीमध्ये शर्ट काढून आनंद साजरा करेल का? असा प्रश्न गांगुलीला विचारण्यात आला होता. 'तो ऑक्सफर्ड स्ट्रीटवर शर्ट काढून फिरेल. आपण सर्वांनी कॅमेरा घेऊन तयार राहिलं पाहिजे.. कोहलीला सिक्स पॅक्स अॅब्स आहेत. जर त्याने शर्ट काढून आनंद साजरा केला तर मला विशेष वाटणार नाही,' असं उत्तर गांगुलीने दिले होते. सौरभच्या या उत्तरानंतर कोहलीने हसत आपण खरचं असं करु शकतो असं म्हटलं होतं. मात्र यावेळी माझ्याबरोबर हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह सुद्धा असेल असंही तो मजेत म्हणाला होता. 'मी एकटाच असा आनंद साजरा करणार नाही. मला खात्री आहे हार्दिक माझ्यासारखाच वागेल. १२० टक्के सांगतो मी. बुमराह पण शर्ट काढून नाचेल कारण त्यालाही सिक्स पॅक्स आहेत. याशिवाय इतरही काहीजण नक्कीच अशाप्रकारे आनंद साजरा करतील,' असं कोहली म्हणाला होता. कोहलीच्या या उत्तरावरुनच एका भारतीय चाहत्याने १५ तारखेच्या हेडिंगचे पोस्टर मैदानात आणले होते. 'भारताने विश्वचषक जिंकला आणि कोहलीने लॉर्डसवर गांगुलीप्रमाणे आनंद साजरा केला' असं हे हेडिंग या चाहत्याने तयार केलं होतं. गांगुली ज्या सामन्यानंतर असा नाचला होता त्या सामन्यामध्ये भारताने लॉर्डसवर इंग्लंडच्या अवाढव्य धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला होता. यावेळी कोहली अवघ्या १३ वर्षांचा होता. १३ जुलै २००२ साली झालेल्या या सामन्यामध्ये भारताने इंग्लंडने दिलेले ३२५ धावांचे लक्ष्य पूर्ण केले होते.