ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिस-या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देत तिस-या दिवसअखेर आठ गडी गमावून ४६२ धावा केल्या आहेत. भारत अद्यापही ६८ धावांनी पिछाडीवर असून त्यांच्याकडे दोन गडी शिल्लक आहेत. मोहम्मद शामी नाबाद आहे. सामन्यात विराट कोहलीचे दीडशतक, अजिंक्य रहाणेची शतकी खेळी आणि मुरली विजयचे अर्धशतक यांच्या जोरावर भारताने साडेचारेशहून अधिक धावांचा टप्पा पार केला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या ५३० धावसंख्येचा पाठलाग करताना भारताने काल १ बाद १०८ धावा केल्या होत्या. आज तिसऱया दिवशी पुजारा आणि मुरली लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी डावाची सूत्रे हाती घेत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई केली. या दोघांनीही ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर वर्चस्व गाजवित शतके ठोकली. विराट आणि अजिंक्य रहाणे या दोघांनी २६२ धावांची मोठी भागीदारी साकारली. विराटने २७२ चेंडूत १८ चौकारांसह १६९ धावा साकारल्या. यासोबत त्याने आपले कसोटी कारकिर्दीतील नववे शतक साजरे केले. एका बाजूला विराट ऑस्ट्रेलियाची धुलाई करत असतानाच दुसरीकडे रहाणे चौफेर फटकेबाजी करत भारताची धावसंख्या वाढवत होता. अजिंक्यने १७१ चेंडूत १४७ धावा केल्या. केवळ तीन धावांनी त्याचे दीडशतक हुकले