बायो बबलमध्ये करोनाने शिरकाव केल्यामुळे मे महिन्यात इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्थगित करण्याची नामुष्की ओढवलेल्या इंग्लंड दौऱ्यावरील भारतीय क्रिकेट संघावर ‘करोनासंकट’ ओढवले होते. यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत आणि सराव साहाय्यक दयानंद गरानी यांना करोनाची लागण झाली झाल्याने संघात चिंतेचे वातावरण होतं. त्यामुळे सावधगिरीची उपाययोजना म्हणून राखीव यष्टिरक्षक वृद्धिमान साहा, गोलंदाजीचे प्रशिक्षक भरत अरुण आणि राखीव सलामीवीर अभिमन्यू ईश्वरन यांना विलगीकरणाचे निर्देश देण्यात आले होते. दरम्यान आता भारतीय संघात पंतचे पुनरागम झाले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियासाठी एक आनंदाची बातमी आहे. विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने करोनावर मात करून डरहॅम येथे भारतीय संघात प्रवेश केला आहे. बायो-बबलमधून २० दिवसांचा ब्रेक मिळाल्यानंतर पंत कोविड पॉझिटिव्ह असल्याचे आढळला होता आणि तो विलगिकरणात होता. भारताचा संघ सध्या कौंटी सिलेक्ट इलेव्हनविरुद्धच्या तीन दिवसीय सराव सामन्यात खेळत आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्विटर हँडलवर ऋषभ पंतचा फोटो शेअर केला आहे. फोटोसोबत “नमस्कार ऋषभ पंत तू परत आल्याने आनंद झाला” असे लिहिले आहे. १९ जुलै रोजी झालेल्या करोना टेस्टमध्ये पंत निगेटिव्ह आढळला होता. पंत करोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर संघात बरीच खळबळ उडाली होती आणि भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका देखील धोक्यात आली होती. माध्यमांनुसार टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज कोविड लसीच्या दुसर्‍या डोसच्या आधी डेंटिस्टकडे गेला होता आणि तेथून त्याला लागण झाली. तसेच पंत गेल्या महिन्यात युरो फुटबॉल सामन्याला हजर राहिला होता. याचे फोटोही त्याने सोशलमीडियावर टाकले होते. ताप आल्यामुळे पंतने करोनाची चाचणी केली. त्यात करोनाची लागण झाल्याचे आढळून आले.चाहत्यांच्या मते, या कारणामुळे तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले.

पंत २८ जुलैपासून होणाऱ्या दुसर्‍या सराव सामन्यात खेळताना दिसणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवानंतर बीसीसीआयने बायो बबलमधून सर्व खेळाडूंना २० दिवसांची रजा दिली होती. यादरम्यान, सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये खूप आनंद घेताना दिसत होते. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.