अजिंक्य रहाणेच्या दमदार शतकी खेळीच्या बळावर आणि भेदक गोलंदाजीच्या जिवावर भारतीय संघानं बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ८ गड्यांनी पराभव केला. या सामन्यात अंजिक्य रहाणेनं अनेक विक्रम मोडले. माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्या एका खास विक्रमाची बरोबरी करण्याचा पराक्रमही रहाणेनं केला आहे. पहिल्या डावात १३१ धावांनी पिछाडीवर पडलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या डावात २०० धावांपर्यंत मजल मारु शकला. ऑस्ट्रेलियानं दिलेलं ७० धावाचं लक्ष भारतानं दोन गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

दुसऱ्या डावात लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर गिल आणि रहाणे यांनी भारतीय संघाला विजय मिळवून दिला. विजयासाठी एक धाव कमी असताना रहाणे शानदार फटका मारत भारताला विजय मिळून दिला. भारतीय संघासाठी विजयी फटका मारण्याची रहाणेची ही पहिलीच वेळ होती. राहुल द्रविडनंतर ऑस्ट्रेलियात विजयी फटका मारणारा रहाणे दुसराच खेळाडू ठरला आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघानं बॉर्डर गावसकर मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे.

आणखी वाचा 

बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा ‘विजयी पंच’, मालिकेतही बरोबरी

वर्षाचा शेवट गोड, ‘त्या’ पराभवाचा घेतला बदला

३१ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांगी टाकली; भारताने केली या संघाच्या विक्रमाशी बरोबर

तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन संघाने ६ बाद १३३ पर्यंत मजल मारत दोन धावांची आघाडी मिळवली होती. कॅमरुन ग्रीन आणि पॅट कमिन्स या जोडीने भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या सत्रात चांगलंच झुंजवलं. अखेरीस कमिन्सला बाद करत बुमराहने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. यानंतर ठराविक अंतराने कॅमरुन ग्रीनही मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ४५ धावांची खेळी केली. सातव्या विकेटसाठी ग्रीन आणि कमिन्स यांच्यातील ५७ धावांच्या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. यानंतर नॅथन लियॉनही सिराजच्या गोलंदाजीवर स्वस्तात माघारी परतला. जोश हेजलवूड आणि मिचेल स्टार्क जोडीने भारतीय गोलंदाजांना अखेरपर्यंत झुंजवत संघाला द्विशतकी टप्पा गाठून दिला. अखेरीस आश्विनने जोश हेजलवूडचा त्रिफळा उडवत कांगारुंचा दुसरा डाव २०० धावांवर संपवला. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद सिराजने ३, बुमराह-आश्विन आणि जाडेजा या अनुभवी त्रिकुटाने प्रत्येकी २-२ तर उमेश यादवने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – आभाळाएवढं दुःख विसरुन तो लढला आणि यशस्वीही झाला, बॉक्सिंग डे कसोटीवर सिराजची छाप

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाची दुसऱ्या डावातही खराब सुरुवात झाली. सलामीवीर मयांक अग्रवाल दुसऱ्या डावातही अवघ्या ५ धावा काढून मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारालाही आपली छाप पाडता आली नाही. ३ धावा काढून पुजारा कमिन्सच्या गोलंदजीवर माघारी परतला. यानंतर मैदानावर आलेल्या अजिंक्य रहाणेने काही सुरेख फटके लगावत भारतीय संघावरच दडपण कमी केलं. यानंतर शुबमन गिलनेही काही चांगली फटकेबाजी करत संघाला विजयाच्या समीप आणलं. अखेरीस रहाणे-गिल जोडीने अधिक पडझड न होऊ देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.