भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला बीसीसीआयने रणजी क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. शमी हा स्थानिक क्रिकेटमध्ये बंगालच्या संघाकडून खेळतो. आगामी केरळविरुद्ध सामन्यात बंगालकडून खेळण्यासाठी शमीने बीसीसीआयकडे परवानगी मागितली होती. बीसीसीआयनेही शमीची विनंती मान्य केली असून, त्याला एका डावात फक्त 15 ते 17 षटकंच टाकण्याची अट घातली आहे. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका लक्षात घेता बीसीसीआयने हा निर्णय घेतल्याचं समजतं आहे.

अवश्य वाचा – मोहम्मद शमीला कोर्टाचं समन्स, अडचणीत वाढ होण्याची शक्यता

विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेत शमीला पहिल्या दोन सामन्यांनंतर विश्रांती देण्यात आली होती. भारतीय संघाचे फिजीओ पॅट्रीक फरहात हे शमीच्या तंदुरुस्तीवर नजर ठेवणार असून, प्रत्येक दिवसाचा अहवाल देणं फरहात यांना बंधनकारक करण्यात आलेलं आहे. 21 नोव्हेंबरपासून भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार आहे. पहिले भारत टी-20 सामन्यांची मालिका खेळणार असून यानंतर 6 डिसेंबरपासून दोन्ही संघांमध्ये 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल.

यंदाच्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये मोहम्मद शमी हा भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर 33 बळी जमा आहेत. बंगालचा कर्णधार मनोज तिवारीने बीसीसीआयने घातलेल्या अटीचं समर्थन केलं आहे. मोहम्मद शमी आमचा महत्वाचा गोलंदाज आहे, त्यामुळे सामन्यात त्याने टाकलेली 15 षटकं आमच्यासाठी पुरेशी असल्याचंही मनोज तिवारीने स्पष्ट केलंय. यंदाच्या रणजी करंडक स्पर्धेत बंगालचा समावेश ब गटात करण्यात आला असून अद्याप त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाहीये.