मुंबई : सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडियाने आणि महिला गटात शिवशक्ती संघाने विजेतेपद पटकावले. एअर इंडियाचा सुशांत साईल आणि महात्मा गांधी संघाची सायली जाधव स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

दादरच्या भवानीमाता क्रीडांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात एअर इंडियाने महिंद्रावर ३५-१८ अशी मात केली. एअर इंडियाने सुरुवातच झोकात केली. त्यांच्या असलम इनामदारने आपल्या व संघाच्या पहिल्याच चढाईत बोनस करीत संघाला गुण मिळवून दिला. एअर इंडियाच्या विजयात अस्लम इनामदारने १२ चढायांमध्ये १ बोनस व ४ गुण घेतले.

महिलांच्या अंतिम सामन्यात शिवशक्तीने महात्मा गांधी संघाचा २६-१७ असा पाडाव केला. रक्षा नारकर, पूजा यादव, पौर्णिमा जेधे यांचा खेळ शिवशक्तीच्या हंगामातील पाचव्या विजयात महत्त्वाचा ठरला. गांधी संघाकडून सायली जाधव, सृष्टी चाळके, तृप्ती सोनावणे यांना अखेपर्यंत खेळ उंचावता आला नाही. सायलीने या सामन्यात अवघे २ गुण मिळवले.

देना बँकेचा नितीन देशमुख व महिंद्राचा अनंत पाटील यांना पुरुषांमध्ये अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई व पकडीचे पुरस्कार मिळाले.