भारताविरूद्धच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर आटोपला. पहिल्या डावांत मिळालेल्या ३३ धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयसाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. स्टीव्ह स्मिथचं अर्धशतक (५५) आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशेनजीक मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला. डावात शार्दुलने चार तर सिराजने पाच बळी टिपले. त्यामुळे या दोघांचे कौतुक करण्यात आलेच. पण त्याचसोबत कर्णधार अजिंक्य रहाणेचा मोठेपणा दिसून आला.

मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी केली. त्याने २० षटकं टाकली. त्यात त्याने ७३ धावांमध्ये ५ बळी मिळवले. मार्नस लाबूशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड असे पाच बळी त्याने टिपले. ऑस्ट्रेलियाचा शेवटचा गडी हेजलवूड बाद झाल्यावर सारे जण पॅव्हेलियनकडे जाऊ लागले. त्यावेळी कर्णधार रहाणेने मनाचा मोठेपणा दाखवत स्वत: पंचांशी संवाद साधला. सिराजने प्रथमच एका डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्यामुळे अजिंक्यने तो चेंडू पंचांकडून मागून सिराजला दिला.

आणखी वाचा- IND vs AUS: ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलने केला कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेला विक्रम

आणखी वाचा- IND vs AUS: रोहितची गोलंदाजी पाहून दिनेश कार्तिकचं मजेशीर ट्विट

अजिंक्यच्या या कृतीची सर्वत्र स्तुती करण्यात आली. दरम्यान, आता रहाणेच्या नेतृत्वाखालील संघाला विजयासाठी ३२८ धावांची गरज आहे.