मेलबर्न कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या डावात ३२६ धावांपर्यंत मजल मारली आहे. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९५ धावांवर गारद केल्यानंतर भारताने कर्णधार अजिंक्य रहाणेचं शतक आणि मधल्या फळीत रविंद्र जाडेजाने केलेल्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर त्रिशतकी मजल मारत पहिल्या डावात १३१ धावांची भक्कम आघाडी घेतली.

अवश्य वाचा – अर्धशतक पूर्ण करताना जाडेजामुळे शतकवीर रहाणे धावबाद, यानंतर मैदानात घडलं असं काही….

११२ धावांची खेळी करुन अजिंक्य रहाणे धावबाद झाला. यादरम्यान मेलबर्नच्या ऐतिहासिक मैदानावर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये अजिंक्य दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. विराट कोहली (३१६ धावा) ला मागे टाकत ५ डावांत ३४४ धावांसह रहाणेने दुसरं स्थान पटकावलं आहे. मेलबर्नच्या मैदानावर अजिंक्य रहाणेची सरासरी ही ८३.५० ची आहे. या यादीत सचिन तेंडुलकर ४४९ धावांसह पहिल्या स्थानी आहे.

दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ५ बाद २७७ पर्यंत मजल मारलेल्या भारताने तिसऱ्या दिवशी सावध सुरुवात केली. रविंद्र जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात एकेरी धाव घेताना संभ्रम निर्माण करत शतकवीर अजिंक्य रहाणेला धावबाद केलं. २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा करुन रहाणे बाद झाला. यानंतर आश्विनच्या सहाय्याने जाडेजाने आपलं अर्धशतक पूर्ण केलं.

अवश्य वाचा – बॉक्सिंग डे कसोटी जिंकण्याची भारताला चांगली संधी, अजिंक्यचं शतक जुळवून आणणार योगायोग  

भारताचे अखेरच्या फळीतले फलंदाज थोडीफार झुंज देतील अशी अपेक्षा होती. परंतू स्टार्कने जाडेजाला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या दिवशी आणखी एक महत्वाचा बळी मिळवून दिला. यानंतर इतर फलंदाजांनी मैदानावर हजेरी लावून परतणं पसंत केलं. अखेरीस ३२६ धावांवर भारताचा पहिला डाव संपवण्यात ऑस्ट्रेलियाला यश आलं. कांगारुंकडून मिचेल स्टार्क आणि नॅथल लियॉनने ३-३, पॅट कमिन्सने २ तर जोश हेजलवूडने १ बळी घेतला.