भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने मोठ्या कालावधीनंतर आपला हरवलेला फॉर्म पुन्हा एकदा मिळवला आहे. काही वर्षांपूर्वी खराब कामगिरीमुळे चर्चेत आलेल्या अजिंक्यने विंडीज दौऱ्यातून चांगलं पुनरागमन केलं. कसोटी संघाचा अविभाज्य भाग असलेल्या अजिंक्यला आपलं वन-डे संघातलं स्थान मात्र टिकवता आलेलं नाहीये. मात्र अजुनही अजिंक्य आपल्या भारतीय वन-डे संघातील पुनरागमनाबद्दल आश्वस्त आहे.

“मला कसोटी सामन्यांमध्ये चांगला खेळ करायचा आहे, धावा काढणं सुरु ठेवायचं आहे आणि मला विश्वास आहे की मी वन-डे संघात पुनरागमन करेन. तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे यावर या सर्व गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही वर्तमानात राहणं आवश्यक असतं, कसोटी सामन्यात माझं संघाच्या विजयात योगदान असेल तर मी वन-डे संघात नक्कीच पुनरागमन करेन.” बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याआधी रहाणे पत्रकारांशी बोलत होता.

२०१६ साली वेस्ट इंडिजविरुद्ध अजिंक्य रहाणे आपला अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-२० सामना खेळला होता. तर गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्यने अखेरचा वन-डे सामना खेळला. यानंतर त्याला भारतीय संघात आपलं स्थान टिकवता आलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात अजिंक्य वन-डे संघात कधी पुनरागमन करतोय याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष असणार आहे.