६१ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अनिसा सय्यदने २५ मि. पिस्तुल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्रिवेंद्रम येथे सुरु असलेल्या स्पर्धांमध्ये अनिसा सय्यदने ३३ गुणांची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं. अनिसा व्यतिरीक्त महाराष्ट्राच्या दोन महिला नेमबाजपटूंनी रौप्य आणि कांस्यपदकाची कमाई केली. शितल थोरातने ३० गुणांसह दुसरं तर कोल्हापूरच्या राही सरनौबतने २८ गुणांसह तिसरं स्थान पटकावलं. उर्वरित प्रकारांमध्ये भाकर या तरुण खेळाडूने राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदाची कमाई केली. हे त्याचं ११ वं सुवर्णपदक ठरलं. तर महिलांच्या ज्युनिअर २५ मि. पिस्तुल प्रकारात हरियाणाची नेमबाजपटू चिंकी यादवने ३१ गुणांसह सुवर्णपदाकाची कमाई केली. याच स्पर्धेत हरियाणाच्या गौरी शेरॉनने रौप्यपदकाची कमाई केली, तर महाराष्ट्राच्या साई गोडबोलेला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.