ज्ञानेश्वरी कामत, रामेश राघवन - response.lokprabha@expressindia.com प्राचीन खेळ कविडी कळी, कवडे आटा, अष्ट चम्मा, आठ चल्लस अशी वेगवेगळी नावं असलेल्या या खेळाचं बुद्धाच्या खेळ सूचीमध्ये वर्णन आहे. त्याची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात. ‘उर’च्या शाही खेळाचे नियम शोधून काढणारे आयìवग फिनकल यांच्याइतका पट्क्रीडांचा तपशीलवार अभ्यास केलेले अगदी क्वचितच आढळतील. आपलाच, ‘पचिसी’ हा त्यांचा अत्यंत आवडता खेळ. ‘हॉकी’ जसा आपला राष्ट्रीय मदानी खेळ आहे तसा ‘पचिसी’ हा भारताचा ‘राष्ट्रीय खेळ’ (पट्क्रीडा) असं त्यांचं म्हणणं आहे. आमचं मत थोडं वेगळं आहे. ‘अष्ट चम्मा’ हा खेळ सर्वसामान्य भारतीयांमध्ये आवडीचा असल्याचं आमच्या लक्षात आलं. फक्त या खेळाची आपण विशेष नोंद घेतलेली नाही. या खेळाला प्रांतागणिक वेगवेगळी नावे आहेत. खालचा तक्ताच बघा ना! याहून वेगळी नावे तुम्हाला आढळली तर archaeomaha@gmil.com वर आम्हाला जरूर कळवा. हा खेळ सर्वसाधारणत: सर्व सामाजिक स्तरांतील स्त्रियांमध्ये प्रचलित आहे. उच्च आíथक स्तरातील स्त्रिया लाकडी पटावर, तर कष्टकरी महिला मातीत पट आखून हा खेळ खेळताना आढळतील. पुरुषमंडळीसुद्धा देवळाच्या दगडी जमिनीवर पट कोरून हा खेळ खेळतात. बदामी, कर्नाटक इथल्या एका देवळातील बाकावर (इ.स. सहावे-सातवे शतक) आणि जयपूरमधील मोटी डुंगरी देवळाच्या (१७६१) जमिनीवरसुद्धा याचे पट कोरलेले दिसतात. सोबतच्या चित्र २ मध्ये पाच बाय पाच चौरसांचा पट विशेष आढळतो आणि सात बाय सातसुद्धा. आमचा सहकारी चारुदत्त आपटेकडे त्याच्या आजीने कापडावर शिवलेला नऊ बाय नऊ चौरसांचा झकास पट आहे. (चौपर खेळाव्यतिरिक्त सहसा इतर खेळांचे पट असे कपडय़ांवर तयार केलेले आढळत नाहीत.) या नऊ बाय नऊच्या पटावर तमिळनाडूत खेळला जाणारा ‘सतुरांकम’ नावाचा एक खेळ आहे, अर्थात त्याचे ‘चतुरंग’ (बुद्धिबळाचा पूर्वज) या खेळाशी काही नाते नाही. ११ बाय ११, १३ बाय १३ असेही पट आहेत. पूर्वी लग्ने दिवस दिवस चालत. स्त्रिया कामे आटोपून हा पट मांडून खेळायला बसत, अशी रामेशच्या आईची आठवण आहे. तरुणींना कामाच्या धबडग्यातून थोडे बाजूला काढले जाई अन् त्यांना खेळताना जाणत्या स्त्रिया त्यांचे निरीक्षण करीत, ज्यातून एखाद्या लग्नाची बोलणी सुरू होत. जमिनीवर पट आखून घरातील बटणे, सुपाऱ्या, वेगवेगळ्या बिया सोंगटय़ा म्हणून घेऊन खेळायला सुरुवात होई. प्रत्येकीकडे चार सोंगटय़ा. या सोंगटय़ांची संख्या वाढली की खेळ अजून रंगे. आंध्रमध्ये फासे म्हणून कवडय़ांचा वापर होतो. चारही कवडय़ा तोंड वर करून पडल्या तर दान पडले ‘चम्मा’ आणि चारही पाठीवर पडल्या तर पडलेले दान ‘अष्ट’. दोन्ही वेळेस तुम्हाला फासे टाकण्याची आणखी एक संधी मिळते. पटाच्या अगदी मध्यभागीचा चौकोन आणि प्रत्येक बाजूच्या मधला चौकोन हे फुलीने दर्शवतात. ही ‘सुरक्षित’ स्थाने. ‘पचीसी’ खेळाच्या नियमाप्रमाणेच याही खेळाचे नियम आहेत. प्रत्येक भिडू आपल्या घराच्या उजव्या हाताला चाल करतो. आतल्या चौरसात सोंगटय़ा उलट, डाव्या बाजूने चालतात, तर त्याहून आतल्या चौरसात पुन्हा उजव्या हाताला चालतात. असे अगदी मधल्या चौकोनात येईपर्यंत चालते. तुमच्या विरुद्ध बाजूला असलेल्या भिडूंच्या घराच्या पुढे तुमची सोंगटी गेली की तुम्ही दोन सोंगटय़ांची ‘जोडी’ करू शकता, अर्थात अशा वेळी तुमच्या जोडीला ‘सम’ दान पडेपर्यंत चाल करता येत नाही. अशा वेगवेगळ्या नियमांनी खेळाची रंगात वाढत जाते. चित्र १ कडे पुन्हा बघितलं तर तो अष्ट चम्माच्या पटासारखा दिसतो. कदाचित हा मूळ पट असेल. सिंधू संस्कृतीत असे अनेक पट, सोंगटय़ा, फासे सापडले आहेत हे आपण जाणतोच. म्हणजे तेव्हासुद्धा हे खेळ लोकप्रिय असणार. ‘उर’च्या शाही खेळासारखा खेळ सिंधू संस्कृतीत खेळाला जात असल्याचे आपण यापूर्वी बघितलेच आहे. इतकेच नाही तर इतरत्र त्या खेळाचे अस्तित्व संपले तरी भारतात तो ‘आशा’ म्हणून खेळला जात होता. तसाच लोथलमध्ये सापडलेला या पटाचा अष्ट चम्माचा पट वंशज असेल का? मधल्या काळातील हे दुवे अत्यंत क्षीण आहेत वा जवळजवळ नाहीत. बुद्धाच्या खेळसूचीमध्ये वर्णन केलेला, जैन धर्मग्रंथातून नापसंत केलेला अष्टपद खेळाचा पट अष्ट चम्माच्या पटासारखाच आहे. फक्त तो आठ बाय आठच्या पटावर खेळला जाई. नंतर जास्तीची दोन सुरक्षित घरे अनावश्यक वाटून सात बाय सातचा पट तयार झाला असेल किंवा हे दोन खेळ पूर्णपणे वेगळेच असतील. एखाद्या पोथीतून अवचित अष्टपद खेळाचे नियम हाती येईपर्यंत आपण फक्त अंदाज करू शकतो. याच्या पटावरील चौकडीने दर्शवलेल्या घरांचे स्थान वैशिष्टय़पूर्ण आहे. प्राचीन काळी प्रचलित असलेल्या वास्तुविद्य्ोत आठ बाय आठ, नऊ बाय नऊ चौरसाच्या मंडलाचे आरेखन असते. जे घर, मंदिर, नगररचनेत वापरले जाई. सर्वात मधले घर हे ‘ब्रह्म-स्थान’ म्हणून ओळखले जाते. प्रत्येक बाजूचे मधले घर हे दिक्पालांचे स्थान. पूर्वेला इंद्र, पश्चिमेला वरुण, उत्तरेला कुबेर अन् दक्षिणेला यम. यांच्या छत्राखाली तुम्ही सुरक्षित असता. फासे वापरून खेळायचे खेळ पूर्वीपासून प्रचलित होतेच. आता हा वास्तूविद्य्ोचा मंडल पट वापरून या खेळाद्वारे अध्यात्म अनुसरले जात असेल का? या खेळाची अनेक रूपे आपल्या आसपास आपल्याला आढळतील. त्या सर्वाचा उल्लेख इथे करत नाही; पण आमच्या विद्यार्थिमित्रांमध्ये याचे एक रूप बेहद्द आवडीचे आहे. त्याचे नाव ‘नवरा-नवरी’. प्रत्येक भिडूकडे दोन सोंगटय़ा असतात. एक ‘नवरा’, ही सोंगटी आपल्या बाजूच्या सर्वात बाहेरील मधल्या घरातून सुरुवात करून उजव्या हाताला चाली करत करत पटाच्या मध्यभागी असलेल्या घरात येते. हा लग्न मंडप, जिथे दुसरी सोंगटी, ‘नवरी’, त्याची वाट बघत असते. मग या मधल्या घरातून ‘नवरा-नवरी’ ही सोंगटय़ांची जोडी बाहेर पडते आणि चाली करत पुन्हा नवऱ्याने जिथून चाल करायला सुरुवात केली त्या घरात प्रवेश करते. इथे गोम अशी की, जर तुम्हाला सम दान पडले जसे २, ४, ६, ८ तर आणि तरच तुमची नवरा-नवरीची जोडी १, २, ३ किंवा ४ घरे, अनुक्रमे पुढे जाऊ शकते. पुन्हा ज्या घरात तुमची जोडी आहे तिथे एखाद्या भिडूंची जोडी आली तर तुमच्या जोडीला परत लग्न मंडपापासून चाली सुरू कराव्या लागतात. हा मार्ग खडतर असल्याचे लक्षात येते आणि खेळातली गंमत वाढत जाते. सौजन्य - लोकप्रभा