भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली याला आशिया चषक स्पर्धेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पण हा निर्णय हा BCCIच्या निवड समितीचा आहे. कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे आणि कोणत्या खेळाडूला विश्रांती द्यायची, हा सर्वस्वी निवड समितीचा निणर्य असतो. त्यात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, असे BCCIने आशियाई क्रिकेट परिषदेला स्पष्ट केले. या स्पर्धेचे प्रसारण करणाऱ्या वाहिन्या (ब्रॉडकास्टर) स्पर्धेत विराट कोहली खेळत नसल्यामुळे नाराज असल्याचे कळत आहे.

एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आशियाई क्रिकेट परिषदेचे (ACC) अधिकारी थुसित परेरा यांना BCCI ने मेल पाठवला. त्यात नमूद केले आहे की माजी क्रिकेटपटूचा समावेश असलेल्या तज्ज्ञांच्या निवड समितीने आशिया चषक स्पर्धेसाठी संघ निवडला आहे. या स्पर्धेसाठी उपलब्ध असलेल्या खेळाडूंपैकी सर्वोत्तम खेळाडूंच्या संघाची घोषणा १ सप्टेंबरला करण्यात आली. संघ निवडीचा अधिकार हा निवड समितीला आहे. त्यामुळे आशियाई क्रिकेट परिषद किंवा ब्रॉडकास्टर यांनी एखाद्या खेळाडूच्या निवडीसाठी दबाव आणू नये.

विराटला या स्पर्धेसाठी वगळण्यात आल्याबाबत स्टार वाहिनीने आशियाई क्रिकेट परिषदेला नाराजी पत्र पाठवले असल्याचा दावादेखील या वृत्तपत्राकडून करण्यात आला आहे. २९ जून २०१७ मध्ये आशिया चषक स्पर्धेच्या प्रक्षेपणाचा करार झाला. त्यावेळी सहभागी प्रत्येक संघ स्पर्धेसाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करतील, असे आश्वासन देण्यात आले होते. विराट कोहली हा सध्या आघाडीचा आणि यशस्वी फलंदाज आहे. त्यामुळे त्याला अशा स्पर्धांमधून वगळल्याने आमच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, अशा आशयाचे पत्र ‘स्टार’कडून आशियाई क्रिकेट परिषदेला पाठवण्यात आले होते.

दरम्यान, साखळी फेरीतील भारतीय संघाचा पहिला सामना मंगळवारी हाँगकाँगशी तर बुधवारी पाकिस्तानशी होणार आहे.